Raj Thackeray Gudi Padwa Speech 2025: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये सध्याच्या राजकारणावर जळजळीत भाष्य केले. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याबरोबरच निवडणूक काळात देण्यात आलेली अनेक आश्वासनांची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली. राज ठाकरेंनी यावेळेस 'लाडकी बहीण' योजनेबद्दलही सूचक विधान केलं.
कर्जमाफीच्या मुद्यावर काय म्हणाले राज ठाकरे-निवडणुकीच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं कर्जमाफी होणार. पण काल अजित पवार म्हणाले की 30 तारखेच्या आधी पैसे भरुन टाका. कर्जमाफी होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही वाटेल ते बोलणार आणि निवडणुका झाल्या की म्हणतात पैसे भरा असे राज ठाकरे म्हणाले.
लाडकी बहीण योजना बंद होणार असं राज ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. तसेच त्यांनी यामागील कारणही सांगितलं आहे. "लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे? विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंजेबावर, तुमच्या प्रश्नावर नाही," असं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला. "लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी 60 हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत," असं राज ठाकरे म्हणाले.
"आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. "आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली? जात जातीला सांभाळत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.
"टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा," असं राज ठाकरे आपल्या भाषणामध्ये म्हणाले.