ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीसंदर्भातल्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. याचं कारण सिनिअर ठाकरे बंधूंनी एकमेकांना दिलेल्या प्रतिसादानंतर आता ज्युनिअर ठाकरे बंधूदेखील युतीसाठी अनुकूल आहेत. आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना युतीसाठी साद घातली होती. यानंतर आता अमित ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलाय. दोन्ही बंधू एकत्र आले तर काही प्रॉब्लेम नसल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. दरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही युतीसाठी अनुकूल असल्याचं चित्र नाशकात समोर आलं आहे.
नाशिक मधील मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आज वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचे करण्यात आलं आहे. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी आणि इतर पदाधिकारी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी पोहोचले होते. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्षातील नेत्यांची जवळीक चर्चेत आली आहे.
विशेष म्हणजे यावेळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून मनसे कार्यालयासाठी भेटवस्तू देण्यात आली. यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो आहे. यावर हिंदुत्व + ठाकरे = महाराष्ट्र असं लिहिण्यात आलं आहे.
सुरूवातील युतीसाठी राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीला उद्धव ठाकरेंनी देखील हात दिला होता. दरम्यान यानंतर संजय राऊतांनी युतीच्या चर्चांना खंड न पडू देता हा मुद्दा लावूनच ठरला. ठाकरेंची शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं राऊतांनी वारंवार सांगितलं. तर सकारात्मक असून काही होत नाही प्रस्ताव कुठे आहे असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केला.
राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे सकारात्मक आहेत. मात्र, दुसरीकडे मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. आधी राज ठाकरेंचा अपमान करायचा आणि नंतर त्यांना पोटापाण्याचा प्रश्न आल्यामुळे त्यांना गोंजारायचं अशी सडकून टीका नितेश राणेंनी केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसे मुंबईत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे महायुतीला देखील राज ठाकरे आपल्यासोबत हवे आहेत.. काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेते नेते उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.
दरम्यान या भेटीत युतीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी देखील पालिके निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं होतं.
राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर मनसेची स्थापना केली. सुरुवातीला महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या मनसेला चांगलं यश मिळालं. मात्र, कालांतरानं राज ठाकरेंच्या मनसेला उतरती कळा लागली. तिकडे शिवसेना भाजपसोबत सत्ता भोगतच राहिली. मात्र, 2019 विधानसभेनंतर आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षाला बुस्टर मिळणार अशी चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येणार
का? असा प्रश्नच आहेच.. मात्र, दुसरीकडे महायुतीची देखील राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.. त्यामुळे महायुतीची रणनीती ठाकरे बंधूंच्या युतीचा डाव हाणून पाडणार का? की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.