Holi Special Train 2025: होळी आणि शिमगा म्हटलं की गाव आठवतच. अवघ्या आठ दिवसांवर होळी आली आहे. गावाला जायचं म्हणजे ट्रेनचा पर्याय खूपच आरामदायक वाटतो. चाकरमान्यांची हीच गरज लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात येते. मध्य रेल्वेवर आणखी 34 होळी विशेष गाड्या धावणार आहे. एलटीटी, पनवेलवरुन कोकणात जाण्यासाठी या गाड्या धावणार आहेत.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ३४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी-मडगाव, पनवेल-मडगाव, तसेच पुणे-दानापूर-पुणे मार्गावरही विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. तसेच मुंबई-बनारस, मऊ, दानापूर, मडगाव, पुणे-हिसार, दानापूर, मालदा टाउन आणि कलबुर्गी-बेंगळुरू या मार्गांवर विशेष गाड्या धावणार आहेत.
मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून १० ते २५ मार्च या कालावधीत या विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने राज्याच्या इतर भागासाठीही विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कोकणासाठी एलटीटी-मडगाव १७ व २३ मार्चला सुटेल, पनवेल-मडगाव १५ व २२ मार्चला सुटेल आणि पनवेल-चिपळूण मेमू (८ फेऱ्या) १३ ते १६ मार्च रोज सोडण्यात येईल.
होळी सणानिमित्त एसटी महामंडळही प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी महामंडळाने मुंबई, ठाण्यातून 195 जादा एसटी गाड्यांची व्यवस्था केली आहे. सोमवारपासून या गाड्या धावण्यास सुरुवात झाली असून 17 मार्चपर्यंत जादा गाड्या प्रवाशी सेवेत राहणार आहेत. महामंडळाकडून ग्रुप-95 आणि आरक्षण-97 अशा एकूण 195 जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्या मुंबई, ठाणे, पालघर जिह्यांतून कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात जाणार आहेत. गुहागर, चिपळूण, खेड, कणकवली, रत्नागिरी, गणपतीपुळे या भागांत जादा एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी गाडय़ा उपलब्ध करून दिल्या जातील, असे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे.