Sanjay Raut Letter to Devendra Fadnavis: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष (Maharastra Politics) आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. आरोप प्रत्यारोप यामुळे आता राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी पत्राच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबत फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बेकायदेशीर प्रकरणांबाबत पुरावे सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो. कृपया आपल्या सोयीची वेळ कळवावी, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना (Sanjay Raut Letter to Devendra Fadanvis) पत्र लिहिलं आहे.
आताच मी आपले एक विधान ऐकलं, गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणता, "मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार". देवेंद्रजी आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावं तेवढं थोडंच, पण आपण जे बोलत आहात तसं महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय ? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत करवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात.
भाजपचे आमदार राहुल कुल (Rahul kul) यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात प्रचंड भ्रष्टाचार (Corruption) झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरशः लुटमार झाली असून किमान 500 कोटींचे मनी लाँडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इच्छितो, असं संजय राऊत (Sajay Raut) म्हणतात.
महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती.
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 4, 2023
बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत
त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve pic.twitter.com/0HsVAk02J3
तसेच, आपल्या मंत्रिमंडळातील दादा भुसे (Dada Bhuse) यांनी 'गिरणा अॅग्रो' नावाने १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचविण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवलं. या अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचं आपलं धोरण असायला हवं. त्या भ्रष्टाचाराबाबत मी आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो, असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी 'विक्रांत' युद्ध नौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना 'क्लीन चिट' दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी विनंती संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केली आहे.