Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्पात भीषण अपघात; क्रेन कोसळून 17 मजुरांचा मृत्यू

Samruddhi Expressway Accident Thane: महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरु असतेवेळी गर्डरसह क्रेन कोसळली आणि काळानं 14 मजुरांवर घाला घातला... 

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्पात भीषण अपघात; क्रेन कोसळून 17 मजुरांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident in Thane: महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरु असतेवेळी एका भयंकर अपघातामध्ये 17 मजुरांचा बळी गेला. अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, त्याबाबतची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मालेगाव येथून अपघात स्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याआधीच हा भयंकर अपघात घडल्यामुळं यंत्रणांनीही तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. 

सोमवारी मध्यरात्री गर्डर जोडण्याचं काम करणारी क्रेन उड्डाणपुलाच्या स्लॅबवर कोसळली. त्यामुळे क्रेन आणि उड्डाणपुलाचा स्लॅब 100 फुटांवरून कोसळला. दरम्यान, प्राथमिक स्तरावर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती.  ज्यानंतर एनडीआरएफनं घटनास्थळी धाव घेत 10 ते 15 जणांना घटनास्थळावरून सुखरुप बाहरे काढलं. पाऊस आणि चिखलामुळे सध्या मदतकार्यात अडथळे उदभवताना दिसले.  

मृतांची नावं (सध्यापर्यंत उपलब्ध यादी)

  • पप्पू कुमार - बिहार 
  • राजेश शर्मा- उत्तराखंड 
  • संतोष जैन- तामिळनाडू 
  • प्रदीप रॉय- पश्चिम बंगाल 
  • कन्नूर- तामिळनाडू 
  • अरविंद कुमार उपाध्याय- उत्तर प्रदेश 
  • लल्लन राजभर- उत्तर प्रदेश 
  • आनंद कुमार चंद्रमा यादव 
  • बेलदार
  • सुरेंद्र कुमार पासवान 
  • राधेश्याम बिरजू यादव 
  • परमेश्वर कुमार  

 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain Updates : पावसानं मारली दडी; पण, 'या' दिवसापासून राज्यात पुन्हा मुसळधार 

कोणत्या कंपनीकडे कंत्राट? 

उपलब्ध माहितीनुसार सदरील कामाचं कंत्राट नवयुग इंजिनिअरिंग कंपनीकडे देण्यात आलं होतं. गंगा नदीवर ब्रिज, धरणांचं काम, मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं कामही याच कंपनीकडे सोपवण्यात आलं आहे. या कंपनीला 90हून अधिक गर्डर लाँचिंगचा अनुभव असून, ती 1986 पासून बांधकामक्षेत्रात सक्रिय असल्याचं म्हटलं गेलं. शहापूर येथे समृद्धीच्या कामादरम्यान कोसळलेलं मशिन सिंगापूर बनावटीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अपघातांची समृद्धी? 

आतापर्यंत समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे प्रवासासाठी सुरु करण्यात आले आहेत. नागपूरपासून इगतपुरीपर्यंतचा प्रवास या मार्गामुळं साध्य होतो. याच महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सध्या सुरु असून, यंदाच्या म्हणजेच 2023 या वर्षअखेरीस हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा तिसरा टप्पा 100 किमी अंतराचा असेल असं सांगण्यात आलं आहे. असं असलं तरीही सध्या मात्र समृद्धी महामार्ग त्यावर होणाऱ्या अपघातांमुळं चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच इथं एका खासगी बसनं पेट घेतला होता ज्यामध्ये 25 जणांचा मृत्यू ओढावला होता. त्याआधीही समृद्धीवर बरेच लहानमोठे अपघात झाले होते. 

 

About the Author

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'म... Read more

Read More