Samruddhi Mahamarg Route: हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ग्रीनफिल्ड हायवे असून मुंबई ते नागपूर या महानगरांना जोडणारा आहे. अलीकडेच समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळं आता मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या 8 तासांत होणार आहे. तसंच, समृद्धी महामार्गाचा विस्तार आता पालघरच्या वाढवणपर्यंत होणार आहे. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासोबतच आता आणखी एक जिल्हा समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. तशी चर्चा एका बैठकीत झाली आहे. त्यामुळं लवकरच यासंदर्भात हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थित नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत झाला होता. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाला गती देतानाच जळगावहून समृद्धी महामार्गावरुन मुंबईला फक्त 5 तासांत पोहोचता येणार आहे. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव ते कन्नड दरम्यानची वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे.
सध्या जळगावहून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचता येते. यासाठी दोन ते अडीच तास लागतात. हाच रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. या रस्ता जोडल्यानंतर जळगाव ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा प्रवास अवघ्या एका तासावर येणार आहे. तसंच, छत्रपती संभाजीनगरहून समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईत येण्यासाठी चार तास लागतात. त्यामुळं जळगाव ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान प्रवासाचा एक तास आणि पुढील प्रवासाचे चार तास असा पाच तासांत जळगाव ते मुंबई प्रवास पूर्ण होणार आहे.
जळगाव धुळे, नाशिकमार्गे मुंबईला जाण्यासाठी महामार्ग आहे. मात्र त्या महामार्गावरुन जाण्यासाठी किमान आठ किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. अशावेळेस जळगावहून छत्रपती संभाजीमार्गे समृद्धी महामार्गावरुन वाहतूक सुरू झाल्यास मुंबईत फक्त 5 तासांत पोहोचता येणार आहे. या रस्त्यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान 118 किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत ८५.३८ किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे वाढवण-इतगपुरी प्रवास केवळ एका तासात करता येणार आहे. या प्रकल्पाच्यादृष्टीने एमएसआरडीसी लवकरच एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे.