Ajit Pawar On Contractor Suicide: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील याने गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येतेय. या घटनेवरुन विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही हर्षल पाटीलला कंत्राट दिलेले नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी प्रसारमाध्यामांना दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी हर्षद पाटील आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही त्यांना कंत्राट दिलेलं नव्हतं. तरीपण एखाद्या व्यक्तीचा जीव जावा किंवा त्याने आत्महत्या करणं, त्याच्यामागची नक्की काय कारणे आहेत, त्याचा तपास पोलीस यंत्रणा करतेय. त्याचा मोबाइलदेखील तपासला जात आहेत. मोबाइलमध्ये वेगळं काही आहे का काही त्याने लिहून ठेवलं आहे की. त्याने कोणाला फोन केले. सगळी माहिती पोलिस मिळवतील,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
'पण झालेली घटना अतिषय दुर्देवी आहे. त्याला काम आम्ही दिलेले नव्हते. मुख्य कंत्राटदार दुसरा होता. त्याच्या हाताखाली हा सब कॉन्ट्रेक्टर होता. सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा प्रश्नच नाही. कुठल्याही कंत्राटदाराची बिलं थकित नाही, अशी आज सकाळच्या मिटिंगमध्ये चर्चा झाली, असं त्यांनी म्हटलं आहे.
सांगलीतील जलजीवन मिशन योजनेची कामं करणा-या कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलीय. बिलाचे पैसे थकल्याच्या नैराश्यातून हर्षलने जीवन संपवल्याची चर्चा आहे. सरकारकडे कामाचे तब्बल दीड कोटी रुपये थकित असल्याची माहिती आहे.. दरम्यान हर्षलच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप तांदूळवाडी ग्रामस्थांनी केलाय. हर्षल यांच्या आत्महत्येमुळे तांदूळवाडी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सरकारने थकीत बिलाचे पैसे तातडीने द्यावेत तसेच त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत घ्यावं,अशी मागणी तांदूळवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. सांगलीच्या तांदुळवाडीतील कंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ शिवसेना UBTकडून आंदोलन करण्यात आलंय....जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध केला..जलजीवन मिशन योजनेच्या थकीत दीड कोटींच्या बिलापोटी हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. सरकारनं हर्षल पाटील यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आऱोप शिवसेना UBTकडून करण्यात आलाय. हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आलीय.