Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आधी वादग्रस्त वक्तव्य, आता दिलगिरी; पोलिसांबद्दलच्या वक्तव्यावरुन संजय गायकवाडांचा यूटर्न!

Sanjay Gaikwads U-turn: राज्यातील महत्वाचे नेते असलेले संजय गायकवाड त्यांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेत आलेयत. 

 आधी वादग्रस्त वक्तव्य, आता दिलगिरी; पोलिसांबद्दलच्या वक्तव्यावरुन संजय गायकवाडांचा यूटर्न!

Sanjay Gaikwads U-turn: पोलिसांबाबत वादग्रस्त विधान करणा-या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना आता उपरती झालीये. अखेर त्यांनी यू-टर्न घेत दिलगिरी व्यक्त केलीये.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कान टोचल्यानंतर गायकवाड नरमल्याचं दिसतंय.

राज्यातील महत्वाचे नेते असलेले संजय गायकवाड त्यांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेत आलेयत. राज्यात त्यांचंचं सरकार आहे आणि त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही असं विधान संजय गायकवाड यांनी केलंय. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात असं म्हणत गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. नवा कायदा आला की हप्ता वाढतो अस पोलिसांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. असं विधान करून त्यांनी गृहखातं सांभाळणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय.

त्यांच्या या वक्तव्यानंतर बरीच चर्चा रंगली. तुमचंच सरकार असताना राज्यात पोलिस दलात हप्तेवसुली चालत असेल तर जबाबदार कोण असे सवाल विचारले जाऊ लागले. अखेर प्रकरण अंगलट आल्यानंतर संजयभाऊ नरमले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.आपल्या तोंडून महाराष्ट्र पोलिस नाव चुकून निघालं असल्याचा दावा त्यांनी केलाय. भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. पण याचवेळी त्यांनी स्थानिक पोलिसांवरील आरोपांवर मात्र आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलंय.

संजय गायकवाडांच्या पोलिसांवरच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापलेत. एकनाथ शिंदेंनी गायकवाडांना कडक समज द्यावी अन्यथा कारवाई करावी लागणार,असा इशारा फडणवीसांनी दिला, तर महाराष्ट्र पोलिसांबाबत असं बोलणं योग्य नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हंटलय.

या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्याचे कान टोचलेत.आपण शिवसैनिक आहात, शिस्त विसरू नका..आपल्या वक्तव्यामुळे पोलिसांचं खच्चीकरण होऊ देऊ नका, असं म्हणत शिंदेनी आपल्या आमदाराला भरसभेत झापलंय.

संजय गायकवाड आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात.आताही महाराष्ट्राचे पोलिस अकार्यक्षम आहेत असं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली. आता मात्र वरिष्ठांनी तंबी दिल्यावर संजय गायकवाड यांनी आपले शब्द मागे घेतलेत. लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी जबाबदारीनेच विधानं केली पाहिजेत.या प्रकरणानंतर आता गायकवाड यांनी यापुढे जबाबदारीने बोलतील अशी अपेक्षा करूयात.

Read More