Sanjay Raut Book Name: राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या, 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन थोड्याच वेळात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या पूर्वीच पुस्तकातील मजकूर चर्चेत असून राऊत यांनी पुस्तकामधून अनेक जुने-नवे किस्से सांगितलेयत. हे किस्से आता हळुहळू सोर येऊ लागले असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालीय. यात त्यांनी अमित शाह, एकनाथ शिंदेंसह भाजप नेत्यांवर निशाणा साधलाय. पण नरकातला स्वर्ग हे नाव कोणी दिलं? याबद्दल फार कमी जणांना माहितीय. राऊतांनीच एका मुलाखतीदरम्यान याची माहिती दिली.
संजय राऊतांना आर्थर रोड तुरुंगामध्ये नेलं जात असताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका फोन कॉलवरुन कसं वाचवलं होतं याबद्दलची आठवण झाल्याचं पुस्तकात म्हटलं आहे. अमित शाहांना बाळासाहेबांनी कसं वाचवलं होतं याचा पूर्ण किस्साच राऊतांनी पुस्तकात सांगितला आहे. तसेच संजय राऊत यांनी या पुस्तकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दलची एक खंत बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं म्हटलं आहे. "माझ्यावर आणि कुटुंबीयावर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, 'संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!' खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नात कायम राहिलं आहे. आम्ही अनेक वर्ष जवळून काम केले. सुख-दुःख वाटलं. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही," असं म्हणत खंत व्यक्त केली आहे.
अटकेच्या आदल्या दिवशी मला एकनाथ शिदेंनी अमित शाह यांच्याशी बोलू का असा फोन केला होता. मी बोललो काही गरज नाही. मी म्हटलं, वर बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही. काही गरज नाही, उद्या मला अटक होऊ द्या आणि तुरुंगात जोय आहे. मी पळून जाणार नाही. वरती बोलण्याची गरज नाही. मी बोलू शकतो वरती, मी समर्थ आहे," असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.यावेळी संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोपही केला. अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच शिवसेना आणि भाजपात दरी पडली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, "अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच भाजपा आणि शिवसेनेत दरी पडायला सुरुवात झाली. अमित शाह यांना अरुण जेटली यांनीही असं करु नका असं समजावलं होतं. मला माहिती आहे, अरुण जेटली मला स्वत: बोलले होते, अमित भाई हे करणं योग्य नाही. ते आपले जुने सहकारी आहेत. आपल्याला त्यांच्यासह राहायचं आहे. अरुण जेटलींनीच मला सांगितलं होतं की, मी दोन वेळा त्यांना समजावलं आहे".
या सर्वात नरकातील स्वर्ग हे नाव कोणी दिलं? असा प्रश्न अनेकांना पडलाय. नरकातला स्वर्ग हे नाव काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे सासरे आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी दिल्याची माहिती संजय राऊत म्हणाले.