Statue of chhatrapati shivaji maharaj collapse : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांना 35 फुटी पुर्णाकृती पुतळा कोसळलाय. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळलाय. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून राजकारण देखील होत असल्याचं पहायला मिळतंय. महाविकास आघाडीने महायुतीला धारेधर धरलं असून मोठ्या प्रमाणात भाजपवर टीका होताना दिसत आहे. अशातच आता संजय राऊतांनी मोर्चा सांभाळला असून त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये.
शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचं चित्र मराठी मनाला विचलीत करणारे आहे. श्रेय घेण्याची घाई, निवडणुकांचे राजकारण आणि राष्ट्रीय कामात खाऊबाजी यामुळेच हे घडले. गद्दारांचे दिल्लीश्वर पुतळ्याची प्रतिष्ठापना करतात ही शिवरायानीच झिडकारले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. महाराजांना हे सरकार मान्य नाही. शिवाजी महाराजांना हे गद्दारांचे सरकार मान्य नाही म्हणून हा प्रकोप झाला. फक्त निवडणुकीसाठी शिवरायांचा वापर केला जातोय, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामात असलेल्या ठेकेदार मे. आर्टिस्टी, कंपनी मालक जयदीप आपटे, सल्लागार चेतन पाटील यांच्या सह पुतळा उभारणीच्या कामात असलेल्या व्यक्तींवर मालवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
हे चित्र मराठी मनाला विचलीत करणारे आहे. श्रेयघेण्याची घाई.निवडणुकांचेराजकारण.आणि राष्ट्रीयकामात खाऊबाजीयामुळेच हे घडले. गद्दारांचे दिल्लीश्वर पुतळ्याची प्रतिष्ठापना करतात हीशिवरायानीच झिडकारले.
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 26, 2024
सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राजीनामाद्या! pic.twitter.com/sLMOhDo6BW
दरम्यान, सर्व शिवप्रेमींची घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे, असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, असं महाविकास आघाडीने म्हटलं आहे.