Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकारी पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांमध्ये खंडणीप्रकरणावरुन काय चर्चा झाली याचे कॉल रेकॉर्ड्स समोर आले आहेत. 'आवादा एनर्जी' कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी मागताना वाल्मिक कराडने कंपनीच्या अधिकाऱ्यांना नेमकं काय सांगितलं आणि या साऱ्या खंडणीप्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचं कनेक्शन काय हे या कॉल रेकॉर्ड्समधील माहितीतून समोर आलं आहे.
सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आवादा एनर्जी कंपनीकडे वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. वाल्मिक रडाने कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावून दोन कोटी रुपये मागितले होते. 'आवादा एनर्जी' कंपनीकडे वाल्मिक कराडने दोन कोटींची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही, तर पूर्ण बीड जिल्ह्यात काम करू देणार नाही, अशी धमकीही वाल्मिक कराडने दिली होती.
'आवादा एनर्जी' कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावण्यात आल्याने या प्रकरणात काम थांबवल्यानंतर संतोष देशमुख यांनी खंडणी मागू नका असं वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना विनंती करत सांगितलं. 'खंडणी मागू नका. आवादा कंपनीच्या लोकांना काम करू द्या. माझ्या गावातील लोकांना त्यामुळे काम मिळेल," असं सतोष देशमुख यांचं म्हणणं होतं. मात्र आरोपींनी संतोष देशमुखांचे म्हणणे ऐकले नाही. त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी गावातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून खंडणी न मागता कंपनीला काम करु देण्यासाठी पुढाकार घेणारे सरपंच संतोष देशमुख यांनाच टार्गेट करण्यात सुरुवात केली.
7 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला कॉल केला. त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितले की, "उद्या जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण भिकेला लागू. असेच होत राहिले तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. त्यामुळे संतोष देशमुख आडवा येत असेल, तर त्याला कायमचा धडा शिकवा." दोघांमधील या संवादाचे हे कथित कॉल डिटेल्स पोलिसांनी आरोपपत्रामध्ये नमूद केल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचा थेट संबंध असल्याचं समोर आल्याने मुंडेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान यावरुन गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.