Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'वाल्मिक अण्णांना...', 6 वेळा 'आवादा'कडे मागितली 2 कोटींची खंडणी; तारखेसहीत तपशील 'झी 24 तास'च्या हाती

Walmik Karad Avaada Energy Convesration: कंपनीच्या अधिकाऱ्याने नोंदवलेला जबाब 'झी 24 तास'च्या हाती लागला आहे.

'वाल्मिक अण्णांना...', 6 वेळा 'आवादा'कडे मागितली 2 कोटींची खंडणी; तारखेसहीत तपशील 'झी 24 तास'च्या हाती

Walmik Karad Avaada Energy Convesration: वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. दोषारोपपत्रात कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जबाबामधून ही माहिती समोर आली आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबात वाल्मिक कराडने सहा वेळा खंडणी मागतिल्याचा उल्लेख आहे.  सुनील शिंदे यांचा जबाब 'झी 24तास'च्या हाती आला आहे.

'जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिली

वाल्मिक कराडबरोबरच सुनील शिंदेंना त्यांच्या टोळीतील इतर गुंडांनीही धमकावलं होतं. सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना, 'तुला बघून घेईन. जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. वाल्मिक कराडने आवादा कंपनीचे अधिकारी असलेल्या सुनील शिंदेंना कितीवेळा आणि कधी कधी धमकी दिलेली याचा तपशील खालीलप्रमाणे -

पहिल्यांदा खंडणी कधी मागितली?

पहिल्यांदा वाल्मिक कराडने 28 ऑगस्ट 2024 रोजी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागितली होती. फोनवरून वाल्मिक कराडने, "तुम्ही परळीत येवून भेटा नाही तर काम बंद करा," अशा शब्दांमध्ये अधिकाऱ्यांना धमकावलं होतं.

दुसरी खंडणी फोनवरुन मागितली

दुसऱ्यांदा वाल्मिक कराडने 11 सप्टेंबर 2024 फोनवरून खंडणी मागितली. यावेळी, "तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे. याची मला माहिती आहे. तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या," असे वाल्मिक कराड फोनवरून म्हणाला होता.

ऑफिसमध्ये धमकावत तिसऱ्यांदा केली खंडणीची मागणी

तिसऱ्यांदा खंडणी 8 ऑक्टोबर 2024 रोजी परळी येथे वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि माझे सहकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली होती. "प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या. नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही," अशी धमकी यावेळी देण्यात आल्याचं शिंदेंनी जबाबामध्ये सांगितलं आहे.

सुदर्शन घुलेच्या माध्यमातून चौथ्यांदा केली मागणी

सुदर्शन घुलेच्या माध्यमातून चौथ्यांदा खंडणी मागण्यात आल्याचं शिंदेंनी सांगितलं आहे. 26 नोव्हेंबर 2024 रोजी कंपनीत येवून सुदर्शन घुलेने, "वाल्मिक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही," अशा शब्दांमध्ये धमकावलं होतं. 

पाचव्यांदा खंडणी मागताना वाल्मिक म्हणाला, 'चालू ठेवलं तर...'

पाचव्यांदा खंडणी मागताना काय झालेलं याबद्दलचा घटनाक्रम शिंदेंनी सांगितला. "29 नोव्हेंबर 2024 रोजी विष्णू चाटेला 11:30 च्या सुमारास कॉल केला होता. त्यावेळी वाल्मिक अण्णा बोलणार आहेत. कराड म्हणाला, "अरे ते काम बंद करा. चालू ठेवलं तर वातावरण गढूळ होऊन बसलं. ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले आहे. त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू कराल तर याद राखा," असं म्हटलं होतं.

29 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजता सुदर्शन घुले मसाजोग येथे कंपनी ऑफिसमध्ये आला होता, असं शिंदेंनी सांगितलं. "वाल्मिक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा. अण्णा आज केजमध्ये येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घ्या, असे धमकावून ऑफिसमधून निघून गेला होता," अशी माहिती शिंदेंनी दिली.

सहाव्यांदा खंडणी मागताना थेट संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी

सहाव्यांदा खंडणी मागताना 06 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले कंपनी ऑफिसमध्ये आला. सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केली. थोपटे यांना दोन कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा धमकी दिली. यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असे येऊन सांगितले. त्यावेळी, "तुला बघून घेतो. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली," असं शिवाजी थोपटे यांनी सुनील शिंदे यांना सांगितलं होतं.

Read More