Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पाटी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मत चोरी झाल्याचा आरोप केला. त्यानंतर आज शरद पवार यांनीही या आरोपाला दुजोरा देणारे विधान केलं आहे, त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar big revelation in Maharashtra politics 2 people came before the Assembly elections they gave guarantee win 160 seats)
नागपुरातील पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणालेत की, मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे, त्यांनी जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ. नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्विकारु असं ठरवलं.
शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ती दोन माणसं कोण आहेत, याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार आणि राहुल गांधींना भेटणारा माणसाने नेमकं कोणती ऑफर दिली होती. त्या लोकांचा निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेशी काय संबंध आहे, ज्यामुळे त्यांनी 160 जागा जिंकून देण्याचा दावा केला, असे अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. त्यात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतांचा झोल झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर आता शरद पवारांच्या विधानानंतर महाराष्ट्रासह देशातील राजकारणात एकच खळबळ माजली आहे.