Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Operation Sindoor : 'विशेष अधिवेशनाची गरज नाही'; काँग्रेसच्या मागणीला पवारांचा विरोध

ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर विरोधकांनी सातत्याने संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली. 

Operation Sindoor : 'विशेष अधिवेशनाची गरज नाही'; काँग्रेसच्या मागणीला पवारांचा विरोध

निलेश खरमरे, झी 24 तास पुणे : ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर विरोधकांनी सातत्याने संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली. इंडिया आघाडीतल्या ब-याच पक्षांनी, केंद्राने अधिवेशन घ्यावं अशी मागणी केली. पण इंडिया आघाडीतले महत्वाचे नेते शरद पवार यांनी विशेष अधिवेशनाची गरज नाही असं म्हणत वेगळा सूर लावला आहे. राष्ट्रहिताच्या मुद्यावर आपण देशासोबत असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. 

 ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून चर्चा घडवून आणावी अशी मागणी काँग्रेसनं केली होती. सरकार सांगतंय एक आणि वस्तूस्थिती वेगळी असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. थोड्या फार फरकानं इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचीही तशीच भूमिका आहे. पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांनी विरोध केलाय. राष्ट्रहिताच्या मुद्यावर आपण वैचारिक मतभेद बाजुला ठेऊन देशासोबत असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. 

सुप्रिया सुळेंनीही देशहिताच्या मुद्यावर देशात कोणतंही सरकार असेल त्या सरकारसोबत राष्ट्रवादी असेल अशी वेगळी भूमिका मांडली. ऑपरेशन सिंदूरबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात मतमतांतरे असल्याचं निरीक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नोंदवलंय. राष्ट्रहिताच्या मुद्यावर एकजूट दाखवणं हे योग्यच असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरु आहे. त्यातच शरद पवारांना आता ऑपरेशन सिंदूरच्या मुद्यावर सरकारसोबत राहावंसं वाटतंय. हे सगळं एकाच प्रक्रियेचा भाग आहे का? असं विरोधकांना वाटू लागलंय.

 

Read More