Bharat Gogawale To The Point Interview: भरत गोगावले यांना त्यांचे कार्यकर्ते तसंच ओळखीतील लोक भरतशेठ अशी हाक मारतात. नेमकं यामागे काय कारण आहे याचा खुलासा स्वत: भरत गोगावले यांनी केला आहे. झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची चेनही काढून दाखवली. भरत गोगावले यांनी गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घातला असून, यामागील कारणांचाही उलगडा केला.
शेठ म्हणण्यामागे काय कारण आहे? असं विचारलं असता भरत गोगावले यांनी सांगितलं की, "गावी आमचे छोटे मोठे धंदे होते, त्यामुळे शेठ म्हणायचे. पण आम्ही मनाचे शेठ आहोत. मनाची श्रीमंती आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, माणसाचं घर मोठं असलं किंवा नसलं तरी मन मोठं असलं पाहिजे. घर मोठं, पण मन खोटं असणारा कधी पुढे जात नाही".
पुढे ते म्हणाले, "माझ्या अंगावर घातलेलं सगळं सोनं आहे. घड्याळही सोन्याचं असून ते मित्राने भेट दिलेलं आहे. माझ्या गळ्यात महाराजही आहेत. आम्ही स्वत:ला महाराजांचे मावळे का म्हणतो हे ते दर्शवतं. गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. शिवाजी महाराज सोन्याचा माणूस होता. 32 मण्यांच्या सोन्याच्या सिंहासनावर आरुढ होणारा जगातील एकमेव राजा, त्या राजाचं सोन्याचं नाय घालायचं, तर मग काय अर्थ आहे?".
"महाराज आमच्या मनात आहेत. तीन कार्यक्रम आम्ही नेहमी गडावर करतो. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, जिजाऊंचा तिथीप्रमाणे होणाररा राज्याभिषेक. कुठेही असलो, अगदी नागपूर अधिवेशनात असलो तरी ते सोडून येतो. म्हणून आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत," असंही ते म्हणाले,
"मी गरिबांचा शेठ आहे. श्रीमंतांचा शेठ कधी होऊ नये. गरिाबला थोडी मदत करा, तो आयुष्यभर विसरत नाही. तो लोकांना सांगतो मंत्री, आमदार कामाला आले होते. आमची जागा, जमीन नाही, पण मनाची श्रीमंती असली तर कधी अडचण येणार नाही," असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.