Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'अमित शाहांची बूटचाटेगिरी करत...', संजय राऊत एकनाथ शिंदेंवर संतापले, 'फडणवीसांनी तुमचं पायपुसणं करुन...'

Sanjay Raut on Eknath Shinde: मेलेल्याला काय मारणार? महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुडदा पाडला आहे अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.   

'अमित शाहांची बूटचाटेगिरी करत...', संजय राऊत एकनाथ शिंदेंवर संतापले, 'फडणवीसांनी तुमचं पायपुसणं करुन...'

Sanjay Raut on Eknath Shinde: अमित शाह आणि कंपनीची दिल्लीत जाऊन बूटचाटेगिरी करत आहात यापेक्षा स्वाभिमानी व्यक्तीला मृत्यू परवडला. तुम्ही मेलेलेच आहात ना. भाजपात जाऊन तुम्ही जी नवी संस्कृती स्विकारली आहे, त्याला ही शोभणारी भाषा आहे अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. मेलेल्याला काय मारणार? महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुडदा पाडला आहे. नुसताच करुन शोर मनगटात येत नाही जोर. वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही असं विधान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केलं आहे. 

"कोण मेलं आहे आणि कोण जिवंत आहे हे येणारा काळ ठरवेल. लोकसभेत तुम्ही मेला होतात, विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात. भविष्यात तुम्हाला राज्यातील जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते हे कळेल. पण उद्धव ठाकरेंबाबत वापरलेल्या शब्दांची नोंद आम्ही केली आहे. याचं त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल", अशा इशाराही संजय राऊतांना दिला आहे. 

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीवरुन केलेल्या टीकेवर संजय राऊत म्हणाले की, "तुम्ही भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाला होतात. तुमचं तुम्ही पाहा ना? आम्ही कोणासोबत युती करावी, दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? बेगानी शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला का नाचत आहे?"

"राज ठाकरे, उद्धव ठाकरे भाऊ आहेत, दोन्ही एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. दोघे काय करायचं ते ठरवतील. महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुमचा इतका तिळपापड का झाला आहे? तुमची अघोरी विद्या कामी येत नाहीये का? तुमची फुटलेली शिंगं तुम्हाला साथ देत नाही आहेत? गुवाहाटीत कापलेले रेडे भविष्यात यश प्राप्त करुन देत नाही आहेत? आमचं आम्ही पाहू. तुमची फडणवीसांनी काय अवस्था केली आहे ते पाहा. तुमचं पायपुसणं केल आहे, पोतेरं केलं आहे. यांना रात्री झोप लागत नाही, तळमळत असतात. आपलं काय होईल या चिंतेत कूस बदलत असतात," असं टीकास्र संजय राऊतांनी सोडलं. 

"उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार घेतला आहे. राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात, एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटीसंदर्भात शिवसेनेची भूमिका शेवटच्या मिनिटापर्यंत सकारात्मक राहील. मराठी माणसाची एकजूट या देशात नवी ऊर्जा, ताकद निर्माण करेल अशी आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले. मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले असं होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड देशातील सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही," असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. 

"आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येत आहोत म्हणून डोममधील डोम कावळ्यांचा तळफळाट सुरु होता. मराठी माणूस एकत्र येणं हे नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना नको आहे. आमचं आम्ही पाहू. तुमच्या पक्षाला चाटायला बूट कमी पडत असतील तर आम्ही पाठवू," असा टोलाही त्यांनी लगावला. 

राज ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले "प्रत्येकजण काळजीपूर्वक पावलं टाकतं. मुंबई, महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलं आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा, एकजुटीचा प्रश्न आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे समंजसपणाने काम करत आहेत".

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर काय फरक पडेल ते फडणवीसांना विचारा. फडणवीसांची तडफड सुरु आहे ती का? चंद्रकात पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची मदत घेतली आहे. ती काय त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का हे स्पष्ट करावं असंही ते म्हणाले. 

Read More