Sanjay Raut On Ladki Bahin Yojana : राजकीय वर्तुळातील काही मुद्द्यांवर अगदी परखडपणे मत मांडणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यावेळी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या महसूल खात्याच्या कारभारावरच कटाक्ष टाकला आहे.
लाडकी बहीण योजना या महायुतीच्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजनेसंदर्भातील अनेक गोष्टी समोर आल्या असून या योजनेमध्ये बहुतांश महिलांनी खोटे पुरावे आणि तपशील सादर करत मदत निधी लाटल्याचं दाहक वास्तवही समोर आलं आहे. ज्यानंतर आता सदरस योजनेमध्ये पुन्हा एकदा अर्जांची आणि अर्जदारांची छाननी सुरू असून योजनेतील लाभार्थ्यांचा आकडा बदलणार असल्याची वस्तूस्थिती पाहायला मिळत आहे.
सत्ताधाऱ्यांच्या याच योजनेसंदर्भातील भूमिकेवर नाराजीचा सूर आळवत स्वतःच्या नावात बदल करून करोडो रुपये लुटले गेले आहेत, अर्थ खात्यातुन हे पैसे गेले आहेत त्यामुळे अजित पवारांनी यांनी राजीनामा द्यावा अशी थेट मागणी राऊतांनी केली.
लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र बहिणींना लाभ दिला असं अजित पवार म्हणत असल्यास त्यांनीच प्रायश्चित्त म्हणून राजीनामा द्यावा असं म्हणताना त्यांच्या अख्तयारित य़ेणाऱ्या अर्थ खात्याच्या कारभारावर कटाक्ष टाकत या राज्याचे पैसे लुटले कोणी? असा खडा सवालही त्यांनी केला. लाडक्या बहिणींनी नव्हे, तर लाडक्या भावांनी नाव बदलून हा लाभ घेतला आहे हे वास्तव मांडल सरकारी कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगत अर्थ खात्याच्या माध्यमातून ही आर्थिक लूट झाल्यानं प्रत्यक्षात योजना सुरू झाली तेव्हाच योग्य रितीनं अर्जांची छाननी झाली नसल्याचा गंभीर मुद्दा राऊतांनी उजेडात आणत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
दरम्यान, लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरताच सीमित असल्याचीच टीका विरोधक करत असतानाच , ही योजना बंद होणार नसल्याचीच भूमिका सत्ताधाऱ्यांनीसुद्धा स्पष्ट केली. मात्र याच योजनेसंदर्भात आता नव्यानं राजकीय हेवेदावे सुरू असल्याचच पाहायला मिळत आहे. तेव्हा आता राऊतांची ही मागणी पाहून त्यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.