ज्ञानेश्वर पतंगे झी 24 तास धाराशिव : नोकरीमध्ये बदली हा कामकाजाचा अविभाज्य भाग असतो. मात्र या बदलीचा काही जण विनाकारण बाऊ करतात. आणि मग बदली टाळण्यासाठी, तसंच आवडत्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी वाट्टेल ते मार्ग शोधले जातात. कहर म्हणजे पिढी घडवणारे शिक्षकही याला अपवाद नाहीत. शिक्षकांनीच बदली टाळण्यासाठी अक्षरशः गैरप्रकाराचे धडे गिरवल्याचं समोर आलंय. अशाच काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन, सोईच्या ठिकाणी बदली करुन घेतल्याच धक्कादायक वास्तव पाहायला मिळालाय. शिक्षकांच्या या गैरप्रकारावर प्रकाशझोत टाकणारा 'झी २४ तास'चा हा पंचनामा.
समाजाला आणि भावी पिढीला दिशा दाखवण्याचं काम शिक्षक करत असतो. त्यामुळंच नैतिकदृष्ट्या शिक्षकी पेक्षा सर्वोच्च समजला जातो. पण यात शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारा एक बदली घोटाळा धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आलाय. आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी चक्क बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करुन आवडत्या ठिकाणी बदली मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. त्यामुळं दुर्गम ठिकाणच्या शाळेवर जाण्यासाठी कायम नाखूष असलेल्या शिक्षकांची अडचण आली. काही शिक्षकांनी यावर नामी तोडगा शोधलाय. या शिक्षकांनी कँन्सर आणि ह्रदयरोगासारख्या आजाराची बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र बनवली. काहींनी तर स्वतःला हातापायानं दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं. एकट्या धाराशिव जिल्ह्यात धडधाकट असलेल्या 100 जणांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिक्षकांनी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या गावात किंवा गावाजवळ बदली मिळवण्यासाठी केलेली धडपड शिक्षण विभागाच्याही लक्षात आली. त्यामुळं त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत काही धक्कादायक तथ्यं समोर आलीयेत. त्यानुसार 39 शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यात. तर 21 शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आपली बदली करवून घेतल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. या प्रकरणाचा अंतिम अहवाल आल्यावर बोगसगिरी करणा-या मास्तरांवर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही उपशिक्षणाधिका-यांनी दिलेत.
समाजाला नैतिकतेचे धडे देणारे शिक्षक आवडत्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी दिव्यांग झाल्याचं सोंग करतायेत. नैतिकदृष्ट्या अधोगतीकडे गेलेले शिक्षक समाजाला कसे वाट दाखवणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय.