Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सोलापुरात खेळली दगड फेकीची होळी; जखमी झाल्याशिवाय थांबत नाही दगडफेक

Stone throwing Holi: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात भोयरे नामक जवळपास चार हजार लोकसंख्येचं गाव आहे. 

सोलापुरात खेळली दगड फेकीची होळी; जखमी झाल्याशिवाय थांबत नाही दगडफेक

Stone throwing Holi: साधारणपणे रंगपंचमी ही विविध रंगाने साजरी केली जाते मात्र सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे या गावात चक्क रक्ताची रंगपंचमी खेळली जाते. हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना? मात्र हे खर आहे. अशा प्रकारची ही धुळवड साजरी करण्यासाठी येथील बुजुर्ग गावकरी मंडळीच तरुणांना प्रोत्साहन देतात. 

गेल्या साडेतीनशे- चारशे वर्षापासून ही परंपरा सुरु आहे. हे तरुण कोण्या दंगलीत किंवा भांडणामुळे दगडफेक करीत नाहीयत तर ती त्यांच्या गावची परंपरा आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात भोयरे नामक जवळपास चार हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावाचे ग्रामदैवत आई जगदंबा भवानी आहे. येथे दोन गटामध्ये दगडांची होळी खेळण्याची परंपरा आहे. गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो. आणि सुरु होते दगडी धुळवड.

शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळीवडीला दिवसभर येथील तरुण दगडे-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. यामध्ये अनेक तरुण जखमी होतात. मात्र हे जखमी लोक दवाखान्यात डॉक्टरकडे न जाता देवीच्या अंगाऱ्यावर नीट होतात. जेवढे जास्त लोक जखमी होतील त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात.

धुळवडीनंतर आंघोळीसाठी नदीत उतरले ते शेवटचेच

काही ठिकाणी धुळवडीला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आलाय. बदलापूर शहरातून एक दु:खद घटना समोर आली आहे. बदलापूरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू झाला आहे. उल्हास नदीत बुडालेले 4 जण दहावीचे विद्यार्थी होते. धूळवड खेळल्यानंतर चारही जण रंग काढण्यासाठी उल्हास नदीवर गेले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.आज दोन ते अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.चामटोली गावाजवळील पोद्दार गृह संकुलातील काही मुलांचा ग्रुप धुळवड संपल्यानंतर रंग काढण्यासाठी उल्हास नदीवर गेला होता.  यावेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले आर्यन मेदर (15 वर्षे) ,आर्यन सिंग (16 वर्षे) ,सिद्धार्थ सिंग (16 वर्षे) ,ओम तोमर (15 वर्षे) या चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे चारहीजण दहावीचे विद्यार्थी होते. 17 तारखेला दहावीचा शेवटचा पेपर आहे. मधल्या दिवसात सुट्टी असल्याने त्यांनी धुळवड सण साजरा केला. धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी गेले होते. त्याच वेळेस ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने पोद्दार गृह संकुलावर शोककळा पसरली आहे.

About the Author

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची स... Read more

Read More