Buldhana ZP School Video: बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर गावातील प्राथमिक शाळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाळा सुरू होण्याआधी काही विद्यार्थ्यांना कचरा उचलण्याचे आणि शाळा झाडण्याचे काम लावल्याचं दिसून येत आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याऐवजी त्यांना वेगवेगळी कामे लावल्यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. मात्र, दादा भुसे शाळेच्या ठिकाणी पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा झाडणे, कचरा उचलणे आणि पाण्याच्या बाटलीचा बॉक्स उचलायला लावले आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनच शालेय काम करून घेण्याचा सपाटा दादा भुसे यांच्या कार्यक्रमात दिसत आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वच ठिकाणी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन देऊन स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, अशातच बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी मुलांना पहिल्याचं दिवशी स्वच्छता आणि पाण्याच्या बाटल्या उचलायला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे अनेकांनी शिक्षक आणि शाळेचा शिपाई यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे.
दादा भुसे आज सिनगाव येथील प्राथमिक शाळेच्या मुलांचं स्वागत करणार आहेत. त्यापूर्वीच हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे शाळेला शिपाई आहे की नाही? तसेच पहिल्याच दिवशी मुलांना काम करायाला लावल्याने पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
दुसरी, चौथीचे विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतिक्षेत
लातूर जिल्हा परिषद शाळेतील दुसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांना अजूनही पुस्तके मिळालेली नाहीत. वाट पहा पुस्तके लवकरच मिळतील अशी उत्तरे शाळेकडून विद्यार्थांना दिली जात आहेत. यावर्षी दोन्ही सत्रांसाठी एकच पुस्तक वापरात येणार आहे. यापूर्वी पहिल्या सत्रासाठी वेगळी अन् दुसऱ्या सत्रासाठी वेगळी पुस्तके दिली जायची. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व पुस्तके मिळणार म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते. मात्र, शाळा सुरू होऊन आठ दिवस झाले तरी ही सर्व पुस्तके मिळत नसल्याने पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.