Sudhakar Badgujar In BJP: "भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने पक्षप्रवेश दिला. आता भाजपा दाऊदला पक्षात प्रवेश देणार का?" असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
"कोणाला पक्षप्रवेश द्यावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु हिंदुत्वाच्या गप्पा मारताना आपण काय करत आहोत, याचे भानही भाजपाला राहिले नाही. भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीम कुत्तासाठी पार्टी दिली होती असा गंभीर आरोप केला. पार्टीत नाचतानाचे त्याचे फोटो विधानसभेत दाखवून कारवाईची मागणी केली होती आणि आता मात्र त्यांनी हिंदुत्व मान्य केले, त्यांचे स्वागतच आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ उद्या दाऊदला पक्षप्रवेश देऊन त्याने हिंदुत्व मान्य केले असेच म्हणणार का?" असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
"भाजपा हा ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवतो पण आज या पक्षात गुंड, मवाली, भ्रष्टाचारी यांचा भरणा झाला आहे. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी व दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्याशी संपत्ती व्यवहार प्रकरणी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी भाजपा सत्तेत भागिदारी करतो. प्रफुल्ल पटेलांना वॅाशिंग मशीनमध्ये धुऊन स्वच्छ करतो. भाजपाचे हिंदुत्व बेगडी आहे, हे आम्ही सातत्याने सांगतो तेच आजही दिसले," असेही सपकाळ म्हणाले.
नाशिक येथील उबाठा गटाचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप, माजी जिल्हाप्रमुख @SudhakarBhau, मनसे नेते माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात नाशिक महापालिकेतील माजी नगरसेवक व त्यांच्या असंख्य समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. १/२ pic.twitter.com/D4nP5AkfSN
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 17, 2025
सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षांनाही दुपारपर्यंत माहित नव्हते. पण पक्ष प्रवेशाला यावे लागले यावरून भाजपा पक्ष नक्की कोण चालवतो? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला आहे.