Samruddhi Mahamarg: महाराष्ट्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचा लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. कित्येत दिवसांपासून महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त बदलत होता. अखेर आता गुरूवार 5 जूनपासून नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जूनला समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचे इगतपुरी येथील सोहळ्यात लोकार्पण केले जाणार आहे.
महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा 76 किमी लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 'एमएसआरडीसी'ने 701 किलोमीटर लांबीच्या प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यातील 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला झाला आहे. तर शेवटच्या टप्प्याचा मार्गाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा होती. यापूर्वी 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी लोकार्पण होणार होते. त्यादृष्टीने 'एमएसआरडीसी'ने हालचालीही सुरू केल्या होत्या. मात्र त्यावेळी पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळू शकली नाही. तेव्हा लोकार्पणाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
इगतपुरी ते आमणे हा 76 किमीचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे. 35 मीटर रूंद आणि 6 लेन दुहेरी बोगदा असा हा मार्ग असणार आहे. इगतपुरी-आमणे, भिवंडी हा टप्पा खुला झाल्यानंतर मुंबईकरांना फक्त 8 तासांत नागपूर गाठता येणार आहे. तसंच, नाशिकवरुनही मुंबई गाठणे शक्य होणार आहे. याआधी मुंबईहून नाशिकला जाताना 3 तास 45 मिनिटांहून अधिक वेळ लागत होता. तो समृद्धी महामार्गामुळं 2 तास 30 मिनिटे इतका कमी झाले आहे. म्हणजेच 1 तास 20 मिनिटांनी हे अंतर घटले आहे.
- हा 6 लेनचा, 120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांब महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे, जो 150 किमी प्रतितास गतीने प्रवासासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
- महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास आहेत.
- इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.