DCM Eknath Shinde On Aurangzeb Issue: "छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडले, त्यांचा कृरतेने छळ केला त्या औरंग्याचे समर्थन करणारे देशद्रोहीच आहेत," असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत केला. डोंबिवली पूर्वेकडील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिंदे यांनी हा अश्वारूढ पुतळा इतिहासाची साक्ष आहे. युवा पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील असेही सांगितले.
डोंबिवली पूर्वेकडील गार्ड सर्कल येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त इंदू राणी जाखड, खासदार श्रीकांत शिंदे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी आधी डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर गार्डन सर्कल हे नाव होतं मात्र आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा युवा पिढीसाठी अभिमान जागवणारा पुतळा आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, "आज शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होतं आहे. हा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ओळखला जाईल. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीम चे अभिनंदन करतो. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे सकाळी लोकार्पण झाले. हा अश्वारूढ पुतळा इतिहासाची साक्ष आहे, युवा पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील. प्रत्येक शिवभक्तांनी महाराजांचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवलं पाहिजे," असं म्हणत खासदार लेकाच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्मारकाचं कौतुक केलं.
नक्की वाचा >> Nagpur Violence: 'पोलिसांवरही दगडफेक झाली, मी पोलीस आयुक्तांना...'; CM फडणवीसांचं आवाहन
"आपल्या देशातल्या काही औलादि आहेत ज्यांना औरंगजेबाचे गोडवे गायला आवडते. ज्यांनी गायले त्याला मी सभागृहात दाखवलं. असा माणूस सभागृहात बसायच्या लायकीचा नाही. त्याच्यावर देशद्रोहाच गुन्हा दाखल करत कारवाई करा अशी मागणी केली. शिवभक्तांच्या, शंभूभक्तांच्या ज्या भावना आहे त्याच भावना एकनाथ शिंदेंच्या आहेत. औरंगजेब महाराष्ट्रचा घास घ्यायला आला होता. औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने कैद केलं. त्यांचा क्रूरतेने छळ केला. इतकी क्रुरता ज्या औरंग्याने दाखवली त्याचे समर्थन करणारे देशद्रोही आहेत." असा घणाघात शिंदेंनी केला.