Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूच्या युतीची जोरदार चर्चा आहे.. राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. तेव्हापासूनच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र त्यानंतर युतीबाबत दोन्ही बाजूंनी टोलवाटोलवी सुरु झाली. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन कधी होणार असा प्रश्न सा-यांनाच पडला. ठाकरे बंधू एकत्र आले नसले तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन सर्वात मोठे पक्ष अखेर एकत्र आले आहेत. शिवसेना आणि मनसे यांची युती झाल्याची चर्चा रंगली आहे. याला कारण ठरले आहे ते डोंबिवलीतील आंदोलन आणि आदित्य ठाकरे यांचे एक विधान.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी अनुकूल आहेत. महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर स्वागत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. डोंबिवलीत पलावा पुलासाठी मनसेसोबत शिवसेना UBTच्या नेत्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. आदित्य ठाकरेंनी मनसेसोबत युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं टाकल्याचं सांगण्यात येतंय. ठाकरेंची शिवसेना जर अनुकूल असेल तर मनसेही फारसे आढेवेढे घेणार नाही असं दिसू लागलंय.
गेल्या 7 वर्षांपासून डोंबिवलीच्या कटाई नाका इथल्या पलावा पुलाचं काम रखडलंय. त्यामुळे या परिसरात वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय त्याच पार्श्वभूमीवर या पुलासाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, डेडलाईन देऊनही पूल सुरु न झाल्यानं शिवसेना UBT आणि मनसेनं एकत्र येऊन आंदोलन केलं. यावेळी शिवसेना-मनसेचा विजय असो अशा घोषणा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे डोंबिवलीतील युतीच्या पुलानंतर आता ठाकरे बंधूंचेही सूर जुळणार का. आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार का.. याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.