Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मनसेनंतर मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरेंची शिवसेनाही मैदानात;विषय तडीस नेणार?

Thackeray Shivsena On Marathi Issue: मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन मनसेनंतर आता ठाकरेंची शिवसेना देखील मैदानात उतरलीय. 

मनसेनंतर मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरेंची शिवसेनाही मैदानात;विषय तडीस नेणार?

Thackeray Shivsena On Marathi Issue: मराठी सक्तीच्या मुद्द्यावर मनसेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील उडी घेतलीय. ज्या हिंदी भाषिकांना मराठी येत नाही त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठी शिकवण्यात येणार आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयाचं मनसेनं देखील स्वागत केलंय.

मराठी सक्तीच्या मुद्द्यावरुन मनसेनंतर आता ठाकरेंची शिवसेना देखील मैदानात उतरलीय. ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना मराठी शिकवू अशा आशयाचे बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांताक्रूझ परिसरात लावण्यात आले आहेत.

'घाबरु नका? चला मराठी बोलूया., चला करुया मराठी भाषेचा सन्मान'. 'घबराए नही... हम सिखाएंगे आपको मराठी भाषा..आइए.मिलकर सिखेंगे मराठी भाषा'... ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आनंद दुबेंनी असे बॅनर लावलं आहे. दरम्यान त्यांनी लावलेल्या बॅनरचं मनसेनं स्वागत केलंय. मराठी भाषा शिकवत असतील तर त्याचं स्वागत करायला हवं अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिलीय.

मराठीच्या सक्तीसाठी शिवसेनेनं नेहमीच आग्रह धरला. तसंच अनेक आंदोलनं देखील शिवसेनेनं केलीत. शिवसेनेच्या आंदोलनामुळे मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळाल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय.

मराठीच्या सक्तीसाठी मागील अनेक दिवसांपासून मनसेचं आंदोलन सुरु होतं. मात्र, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेनं आंदोलन स्थगित केलं. दरम्यान मनसेनंतर मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरेंची शिवसेना देखील मैदानात उतरलीय.

राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलं आहे?

सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली. 

पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ?

आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. 

त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील !

Read More