Uddhav Thackeray Shivsena Raj Thackeray MNS Alliance: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का? यासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी 'मातोश्री'वरील पत्रकार परिषदेत केलेल्या सूचक विधानावरुन राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारा मोठ्या निर्णयाची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते असं म्हटलं जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या याच विधानासंदर्भात वृत्तांकन करताना ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या मुखपृष्ठाने आज सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 2006 साली राज ठाकरेंनी शिवसेनेमधून बाहेर पडत नवीन पक्षाची म्हणजेच मनसेची स्थापना केल्याची घोषणा केली. तेव्हापासूनच आजपर्यंत म्हणजेच 19 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते चित्र आज 'सामना'त पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर चारकोपमधील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाही सुजाता शिंगाडे यांचा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार यासंदर्भात विचारणा करण्यात आली. तसेच मनसेने तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याचं सांगत पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, "जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे तेच होईल," असं सूचक विधान केलं. याच विषयावर अधिक भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी, "मी संदेश नाही, बातमीच देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहे. त्यांच्याही मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन," असंही म्हटलं.
आता उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात सकारात्मक संदेश दिल्याचं वृत्त 'सामना'मध्ये छापून आलं आहे. मात्र हे वृत्त छापताना 'सामना'च्या मुख्य मथळ्याखालीच उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची बातमी झळकली आहे. मात्र या बातमीच्या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या बातमीसाठी राज आणि उद्धव ठाकरे बाजूबाजूला बसून एकमेकांशी हितगुज करतानाचा जुना फोटो छापण्यात आला आहे. या फोटोत उद्धव राज ठाकरेंना काहीतरी सांगत असून राजही थोडं उद्धव यांच्या बाजूला झुकून त्यांचं म्हणणं ऐकत असल्याचं दिसतंय. शिवसेनेमधून बाहेर पडून मनसेची स्थापना करणाऱ्या राज ठाकरेंचा मागील 19 वर्षांमध्ये म्हणजेच जवळपास दोन दशकांमध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच 'सामना'च्या मुख्य बातमीला आणि तो ही एवढा मोठा फोटो छापण्यात आला आहे. यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. हा फोटो म्हणजे दोन्ही सेनांमधील चर्चा सकारात्मक सुरु असल्याचा संदेश असल्याचं बोललं जात आहे.
या बातमीमध्ये उद्धव काय बोलले याबरोबरच दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून कसा साथ-प्रतिसाद दिला जातोय याबरोबरच राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.