Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

टोकाचे आरोप करणारे खाजगीत मात्र गप्पात दंग, संजय शिरसाट- अंबादास दानवेंत दिलजमाई?

खाजगीत तेरी मेरी यारी जगासमोर दुनियादारी, या उक्तीचा प्रत्यय सध्या संभाजीनगरच्या राजकारणात येतो आहे.

टोकाचे आरोप करणारे खाजगीत मात्र गप्पात दंग, संजय शिरसाट- अंबादास दानवेंत दिलजमाई?

Sanjay Shirsat And Ambadas Danve : खाजगीत तेरी मेरी यारी जगासमोर दुनियादारी, या उक्तीचा प्रत्यय सध्या संभाजीनगरच्या राजकारणात येतो आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ सध्या यांच्यात हॉटेल खरेदीवरन चांगली जुंपली आहे.  दोघेही एकमेकांवर टोकाचे आरोप करत आहेत. मात्र दुसरीकडे लग्न सोहळ्यात भेटताना मात्र जणू ते जुने मित्र फार वर्षानंतर भेटले अशा अविर्भावात गप्पा सुरू करत आहेत. त्यामुळे जनतेला मात्र प्रश्न पडला आहे की हे चालले आहे. पाहुयात सविस्तर 

एकमेकांशी हस्तांदोलन करणारे अगदी हसत हसत गप्पा मारणारे हे तेच दोन नेते आहे जे सध्या माध्यमांमध्ये एकमेकांवर टोकाचे आरोप करत तुटून पडले आहेत. कुणी कुणाचे कुटुंब काढतो तर कुणी घर जाळून टाकण्याची भाषा करत आहे. बरं हे सगळं सुरू आहे ते संजय शिरसाट यांच्या हॉटेल खरेदी प्रकरणावरून. संजय शिरसाट यांनी विट्स हॉटेल खरेदी करताना अनियमितता केल्याचा आरोप केला होता. त्यावरुन दानवे आणि शिरसाटांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या होत्या.

'चक्रम माणसाला मंत्रिमंडळात स्थान कसं'? 

यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी घराला आग लावायला कमी करणार नाही असं म्हटलं होतं. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चक्रम माणसाला मंत्रिमंडळात स्थान कसं मिळालं? असा सवाल उपस्थित केला आहे. 

या गंभीर आरोपा नंतर संभाजीनगरच्या एका लग्नात हे दोघे भेटले आणि त्यांच्या गप्पा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यांच्यात आरोपांच्या फैरी सुरु आहेत हे कुणाला सांगूनही पटणार नाही. त्यामुळं त्यांचे आरोप म्हणजे लुटूपुटूची लढाई आहे का असा संशय निर्माण व्हायला लागला आहे. राजकीय संस्कृती म्हणणं ठिक आहे. पण गंभीर आरोप करुन एकमेकांशी हास्तांदोलन करणं हे कितपत योग्य आहे असाही प्रश्न आहे.

अंबादास दानवेंकडून सारवासारव

या भेटीवर अंबादास दानवेंनी सारवासारव केली. तर संजय शिरसाटांनी या मुद्द्यावर बोलणं टाळलं. जेव्हा झी 24 तासनं यावर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते हात जोडून पुढं निघून गेले. त्यामुळे राजकारणात काहीही अशक्य नाही असं बोललं जातं आहे. टोकाचे शत्रू कसे आणि कधी मित्र होतील हे सांगता येत नाही. एकमेकांवर तुटून पडणारे हे नेते खाजगीत कसे वागतात हे दृश्य पुढं आलं आहे. राजकारणी जनतेला वेड बनवून फक्त राजकारण साधत नाही ना असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

Read More