Uddhav Thackeray On Waqf Amendment Bill: लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाला मान्यता मिळल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेच्या पटलावर चर्चेसाठी ठेवलं जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच या विधेयकाला विरोध आणि समर्थन करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या विधेयकाला विरोध केल्याने त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांकडून विरोध होत असतानाच आता स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळेस त्यांनी गृहमंत्री अमित शाहांनाही खोचक टोला लगावला आहे.
"अमेरिकेने इशारा दिला होता की कर वाढवू. आजपासून कर वाढवले आहेत. आर्थिक संकट कोसळेल अशी स्थिती असताना देशाला विश्वासात घ्यायला हवे होते. लोकांना सत्यस्थिती समजावून सांगायला हवी होती. आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता पण याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून वेगळा विषय काढला गेला," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
"ईदच्या मेजवान्या झोडून विधेयक मांडले. किरीन रिजिजू यांनी गोमांसचे समर्थन केले. त्यांनीच हे विधेयक मांडले. लोकांना लढवून राजकीय पोळ्या भाजायच्या असं भाजपचं विकृत राजकारण आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. "विधेयकात काही गोष्टी जरूर चांगल्या पण यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत," असं म्हणत ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. "370 कलम वेळी आम्ही पाठींबा दिला होताच की," असंही सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत.
"वक्फच्या जमिनीवरच यांचा डोळा आहे. अमित शहांनी जिनांना लाजवेल असं मुस्लिमांसाठीचे भाषण काल केले," असा टोला ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला. "आम्ही हिंदुत्व सोडले असं म्हणणाऱ्या गद्दारांना आजूबाजूला मुस्लिमांचे चालणारे लांगुलचालन कसे चालते?" असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. "आम्ही विधेयकाला नव्हे तर यांच्या ढोंगाला, होणा-या भ्रष्टाचाराला विरोध केला आहे," असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव यांनी सोडले आहेत. त्यांनी काँग्रेसचे विचार स्वीकारलेत. त्यांनी विधेयकाला विरोध करुन मतांचे लांगुलचालन केलं असून मुंबई महापालिकेसाठी त्यांनी हे केलं आहे," असा टोला राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला लगावला आहे. "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव यांनी सोडले आहेत. त्यांनी काँग्रेसचे विचार स्वीकारलेत. त्यांनी विधेयकाला विरोध करुन मतांचे लांगुलचालन केलं असून मुंबई महापालिकेसाठी त्यांनी हे केलं आहे," असं बानकुळे म्हणाले.