Dhananjay Munde : संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले. वादाच्या केंद्रस्थानी सापडलेल्या मुंडेंनी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात जाऊन ध्यानसाधना केली आहे. ध्यानसाधना पूर्ण करून मुंडे तिथून रवाना झालेत. मात्र, त्यानंतर मुंडे गेले कुणीकडे असा प्रश्न सर्वांना पडतो आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे अचानक ध्यानसाधनेसाठी गेले. इगतपुरीमधील विपश्यना केंद्रात 9 दिवस धनंजय मुंडेंनी ध्यानसाधना केली. ना कुठला मोबाईल फोन ना बाहेरच्या जगाशी कुठला संपर्क. मन:शांतीसाठी तब्बल 9 दिवस मुंडे ध्यानस्थ झाले होते. ध्यानसाधनेच्या शेवटच्या दिवशी ग्रूप फोटो किंवा कुठल्याही साधकासोबत बोलणंही मुंडेंनी टाळलं. रविवारी पहाटेच त्यांची साधना संपली आणि धनंजय मुंडे रवाना झाले. मात्र ते कुठे गेले याची कुणालाच कल्पना नाहीये.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. त्यांच्यावर गंभीर आरोपही होऊ लागल्याने त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ लागली होती. त्यामुळे वादात अडकलेले धनंजय मुंडे मनःशांतीकडे वळाले आहेत. मुंडे अचानक ध्यान करण्यासाठी निघून गेल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात.