Walmik Karad in Mantralay: धान आणि कापूस उत्पादक शेतक-यांच्या मुद्द्यावरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी कृषीमंत्र्यांचे कान टोचलेत. तर जोवर शेतक-यांना भरपाई देणार नाही तोवर प्रश्न आणि तुम्हालाही सोडणार नाही अशी ठाम भूमिकाही मुनगंटीवारांनी घेतलीये.तर मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण असा सवाल करत सरकारला घरचा आहेर दिलाय.
कापूस आणि धान उत्पादक शेतक-यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी भर सभागृहात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे कान टोचलेत. चंद्रपूर जिल्ह्यातील धान आणि कापूस उत्पादकांना अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. मात्र त्या प्रश्नावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी केवळ एका शब्दात उत्तर दिल्याने मुनगंटीवार संतापल्याचं पहायला मिळालं.मंत्र्यांनी केवळ सचिवांनी सांगितलेलं उत्तर द्यायचं नसतं असं म्हणत मुनगंटीवारांनी कान टोचलेत.
नुकसानीच्या पंचनाम्याचा प्रस्ताव कृषी खात्याला पाठवल्यावरही नुकसान भरपाई दिली जात नाही असा आरोप मुनगंटीवारांनी केलाय. तर शेतक-यांचे पैसे अडवणारे मंत्रालयातील आधुनिक वाल्मिक कराड कोण आहेत? असा सवालही त्यांनी केलाय.
शेतक-यांचे प्रश्न सुटत नाहीत तोवर प्रश्न आणि तुम्हालाही सोडणार नाही अशी ठाम भूमिकाही मुनगंटीवारांनी घेतलीये. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतक-यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारानेच कृषीमंत्र्यांचे कान टोचल्यानंतर तरी शेतक-यांना नुकसान भरपाई मिळेल ही अपेक्षा.. या प्रश्नाच्या माध्यमातून त्यातून मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर देण्याची संधीही साधल्याचं पाहायला मिळालं.
विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना भाजप आमदार सुधीर मुंनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवलीय. कृषी विभागाच्या एका उत्तरावर मुनगंटीवार संतापले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी देखील चुकीने काही काळ मंत्री होतो.मुनगंटीवारांच्या या विधानावरून सभागृहात जोरदार टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं. भाजपने मंत्रिपद डावललेले आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवलीय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना मी ही चुकून मंत्री होतो असं विधान केलं. यावरून विधानसभेतील सदस्यांनी टोलेबाजी केली. मात्र या विधानामुळे बोलता बोलता मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखदच बोलून दाखवलीय. 2014 ते 2019 आणि त्यानंतर 2022 ते 2024 पर्यंत मुनगंटीवार मंत्री होते. मात्र 2024 च्या निवडणुकीनंतर त्यांना वगळण्यात आल्यानं ते नाराज आहेत.
सुधीरभाऊंच्या चुकून मंत्री झालो या विधानानंतर मंत्री आशिष शेलार ही या चर्चेत सामिल झाले.. सुधीरभाऊ चुकून नाही तर ते जनतेने ठरवून मंत्री होते.. असं आशिष शेलारांनी म्हटलंय. त्यामुळे चुकून मंत्री होते हे विधान रेकॉर्डवरून काढण्याची मागणी शेलार यांनी केलीय.आता भाजपच्याच दोन दिग्गजांमध्ये ही टोलेबाजी सुरू झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही यात उडी घेत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.. तर त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही मिश्किल उत्तर दिलं, मुनगंटीवार यांच्या मी ही चुकून मंत्री होतो या विधानानंतर सभागृहात जुगलबंदी रंगली खरी मात्र यातून मंत्रिपदावरून डावलल्याची खदखद मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलीय. आपल्याला डावलल्याची भावना मुनगंटीवार यांना अद्यापही सलत असल्याचं दिसतंय.