VVPAT Machine No Use Local Body Elections 2025 : व्हीव्हीपॅटवरून राज्यात चांगलंच राजकारण रंगल आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या व्हीव्हीपॅटविनाच होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानं यासंदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान या निर्णयाला विरोधकांकडून विरोध करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे.
महाराष्ट्रात आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व्हीव्हीपॅटविनाच होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानं याबाबत स्पष्टता दिली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात ठाकरेंची शिवसेनेनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. तसंच व्हीव्हीपॅट नको मग निवडणूक कशाला घेताय असा सवाल देखील विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतोय. तर निवडणूक आयोग सरकारचा गुलाम झाल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.
पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी देखील व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावर रोखठोक भूमिका मांडली आहे. व्हीव्हीपॅटचा उपयोग करणार नसतील तर आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही असं विधान रोहित पवारांनी केलं आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या सवालानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कोणत्याही राज्यातील निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट वापरत नाही. तसंच व्हीव्हीपॅटमुळे अधिकचा वेळ लागत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारेंनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचं दार ठोठावलं आहे. केंद्रीय निवडणू आयोगाला पत्र लिहित भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं
ठरणार आहे.