Aurangzeb Tomb In Maharashtra Sambhaji Nagar : शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू मुघल बादशहा औरंगजेब छावा (Chhava) चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे औरंगजेबच्या कबरीला एएसआय अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे संरक्षण मिळाले आहे.यामुळे कबर हटवता येत नाही. औंरगजेबची कबर ज्या जागेवर आहे ती जागा ज्याच्या मालकीची आहे त्याचे नाव जाणून धक्का बसेल.
अत्यंत जुलमी आणि क्रूर मुघल शासक अशी औरंगजबेची ओळख होती. मार्च, 1707साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू 3 झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेबने तसं मृत्यूपत्रच बनवून ठेवले होते. औरंगजेबच्या इच्छेनुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली.
आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. औरंगजेबानं आपली कबर फक्त 14 रुपये 12 आणे एवढ्याच खर्चात बनवायची असं सांगितलं होतं. त्यात त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे मृत्यूपत्रात लिहीले होते. मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्याच इच्छेनुसार सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधली. लाल दगडांनी बांधलेली ही कबर अत्यंत साधी आहे. याच दर्ग्यामध्ये हैदराबादच्या निजामासह इतर काही मुघल राज्यकर्त्यांच्याही कबरी आहेत.
औरंगजेबानं आपल्या अखेरच्या टोप्या विणून त्यातून आलेल्या पैशांमधून कबरीची जागा विकत घेतल्याची अख्यायिका आहे. आता मात्र, औंरगजेबची कबर ज्या जागेवर आहे ती जागा वक्फ बोर्डाच्या माकलीची असल्याचा दावा केला जात आहे. औरंगजेबाच्या कबरीचं सरंक्षण करण्याच्या मागणीसाठी मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा केला आहे.
मी मुघल कुटुंबांचा उत्तराधिकारी आहे. शेवटचे मुघल बहादूर शाह जफर यांचा पणतू आहे. माझे पूर्वज बादशहा औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साधी आहे. गेल्या काही दिवसांपासून काही लोकं ही कबर उखडून फेकण्याची मागणी करत आहेत. मात्र औरंगजेब यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मेले. भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे. सध्या औरंगजेबाची कबर वक्फची प्रॉपर्टी आहे आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. काही लोक इतिहासाची मोडतोड करत आहे आणि दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. असले प्रयत्न हाणून पाडण्याचे सरकारचे काम आहे. मी राष्ट्रपती महोदय यांच्या लक्षात आणून देत आहे की, औरंगजेबाची कबर आहे त्याचा मी संरक्षक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे या प्रॉपर्टीचं महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने संरक्षण करावे. तसंच याबाबत योग्य ते आदेश तातडीने संबंधित यंत्रणांना द्यावेत.