Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं फिर्यादी शिवराज देशमुख यांच्या जबाबातून उघड झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळेत या प्रकरणाची दखल घेतली असती तर संतोष देशमुख वाचले असते असं शिवराज देशमुख यांनी जबाबात सांगितलं आहे.
शिवराज देशमुखांचा जबाब काय?
संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर मी लगेचच पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन, बनसोडेंना हकीकत सांगितली. मात्र, पोलिसांनी मला तीन ते साडेतीन तास पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवलं. फिर्याद दमानं लिहावी लागते असं पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले. कायद्यात बदल झाल्यामुळे पुस्तक पाहून कलम लावावे लागतात असे देखील पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे फिर्यादीसाठी बराच वेळ लागल्याचं शिवराज देशमुख यांनी त्यांच्या जबाबात सांगितलं आहे.
पोलिसांनी या घटना गांभीर्याने लक्षात घेतली असती आणि लगेच कारवाई केली असती तर संतोष देशमुख वाचले असते. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यासोबतच पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन देखील तपासले नाही. ज्या स्कॉर्पिओमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्या कारची देखील पोलिसांनी शोध घेतला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पोलीस देखील दोषी आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांना सहआरोपी करा, जरांगेंची मागणी
पोलिसांनी हलगर्जीपणा केला नसता तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता. त्यामुळे तिन्ही पोलिसांना हत्या प्रकरणात सहआरोपी करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर पोलिसांवर कारवाईची आवश्यकता असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात गेला आहे. तर आता या प्रकरणात पोलिसांनीही हलगर्जीपणा केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाईची टांगती तलवार आहे.