Mumbai Jogeshwari Girl Gang Rape : राज्यात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कराची घटना ताजी असतानाच अत्याचाराचे सत्र महाराष्ट्रात सुरु आहे. स्वारगेट येथे शिवशाही बसमधील तरुणीवर अत्याचारानंतर आता मुंबईत बलात्काराची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका बारा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. मुलीला एकट बघून हे नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला.
या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपी एसी मेकॅनिक असल्याची माहिती आहे. सुदैवाने अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची विचारपूस केली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर येताच त्यांनी लगेच जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क केला असता तरुणीचा अपहरण झालं असल्याची तक्रार आल्याचं त्यांनी सांगितलं. मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्स) कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून पाचही नराधमांना अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता
पीडित मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर ती दादर रेल्वे स्थानकावर सापडली. तिच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत. पीडित मुलगी जोगेश्वरीत नातेवाईकाबरोबर राहत होती. 24 फेब्रुवारी रोजी ती बेपत्ता झाली होती. 27 फेब्रुवारीला पीडित मुलगी रेल्वे पोलिसांना दादर स्थानकात सापडली. रेल्वे पोलिसांनी तिला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर जोगेश्वरी परिसरात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
मुंबई पोलिसांकडून महिलाविरोधी गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर
मुंबई पोलिसांच्या आकेवारीनुसार, गेल्यावर्षी बलात्काराचे 1050 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी 983 गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत. यामध्ये 1231 अल्पवीन मुलींच्या अपहरणाची नोंद झाली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात महिला अत्याचार संबंधित 622 गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी 447 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये बलात्काराचे (82), अपहरण (128) आणि विनयभंग (231) गुन्ह्यांची नोंद आहे.