Mumbai Traffic Police : मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या 13 महिन्यांत 1 जानेवारी 2024 ते 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 65,12,846 वाहन चालकांविरोधात कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईत 526 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी केवळ 157 कोटी रुपयांची वसुली वाहतूक पोलिसांनी केली आहे. तर 369 कोटी रुपयांची थकबाकी अजूनही राहिलेली आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट केली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 प्रकारच्या वाहतूक नियमभंग प्रकरणांमध्ये 41 वाहतूक आणि 1 मल्टिमीडिया विभागाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. मात्र, केवळ 20,99,396 वाहन चालकांनी दंड भरला असून अद्याप 44,13,450 वाहन चालकांनी दंड भरलेला नाही.
फ्लिकर आणि अंबर दिव्यांवर कारवाई
मुंबई वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करत फ्लिकर आणि अंबर दिवे वापरणाऱ्या 47 वाहन चालकांविरोधात कारवाई करत 23,500 रुपयांचा दंड आकारला आला. मात्र, यातील केवळ 7 वाहन चालकांनी 3,500 रुपये दंड भरलेला आहे. यामध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई ही मरीन ड्राईव्ह परिसरात केली आहे. यामध्ये 32 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई आरटीआई कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, मुंबई वाहतूक पोलिसांनी समाधानकारक कारवाई केली असली तरीही अधिकाऱ्यांची व कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणावर दंड वसुली होत नाही. त्यामुळे दंड न भरलेल्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक विशेष वसुली मोहीम राबविण्याची गरज आहे. दंड वसुलीसाठी वाहनचालकांना डिजिटल नोटिसा पाठवाव्यात. मोठ्या थकबाकीदार वाहनधारकांची वाहने जप्त करण्याची प्रक्रिया राबवावी असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.
वाहतूक विभागाची होळी आणि धुळवडमध्ये विशेष मोहीम
मुंबई वाहतूक पोलिसांनी होळी आणि धुळवडच्या दिवशी एक विशेष मोहीम राबवली होती. ज्यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी 17, 495 वाहन चालकांवर कारवाई केली. यामधून तब्बल 1 कोटी 79 लाख 79 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.