Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये 241 प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला विमान अपघात सायबर हल्ल्याच्या माध्यमातून विमानातील यंत्रणा नियंत्रणात घेऊन घडवण्यात आला का? असा सवाल उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पत्राकारांशी संवाद साधताना अपघातग्रस्त ड्रीमलाइनर कंपनीच्या विमानाचा व्यवहार झाला तेव्हा युपीए सरकार सत्तेत असताना भाजपाने या व्यवहाराबद्दल अनेक शंका उपस्थित केलेल्या हे सांगायलाही राऊत विसले नाहीत.
"आता ड्रीम लाइनर च्या अपघाताची चौकशी सुरू आहे. लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्यासाठी देश विदेशातल्या अनेक एजन्सी तपास करत आहेत. त्यावर मत व्यक्त करणे योग्य नाही पण ड्रीम लाइनरचा डील झालं होतं तेव्हा भाजपाने शंका उपस्थित केली होती त्याच्या क्षमतेविषयी त्यांच्या असे अनेक शंका होत्या कारण युपीएच्या काळात ही खरेदी झाली होती. आता हा अपघात झाल्यावर तपास सुरू आहे. मुळात अपघात झाला कसा हे घडलं कसं हे एव्हिएशन एजन्सीला पडलेला कोडं आहे. एकाच वेळी दोन इंजिनं बंद पडली कशी? सायबरच्या माध्यमातून कोणी हायजॅक केले होते का?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
"शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत त्या अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणाच ठप्प केली जाते. मिलिटरी यंत्रणात ठप्प केली जाते. याचा तपास एजन्सी करत असेल तर त्यावर फार चर्चा करणे गरजेचे नाही. शंका आहेत पण शंका व्यक्त करून गोंधळ निर्माण करणे योग्य नाही," असं राऊत म्हणाले.
"अहमदाबाद एटीसीमध्ये क्षमतेपेक्षा माणसं कमी आहेत. ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे तेथे माणसं कमी आहेत. अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे? या एअरपोर्टवर विमानाच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे? या सगळ्या गोष्टींवर आज प्रवाशांच्या मनात संशय आहे. हा संशय असाच राहील," असं राऊतांनी म्हटलं आहे.
"मंत्री मृत्यूच्या ढिगारवरती उभे राहून ज्या पद्धतीने वागत होते रील बनवत होते त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही दिसत नव्हता. जे मृत्यू पावले त्यांचे दुःख आम्हाला आहे पण सरकारला फार मोठा धक्का बसला आहे किंवा सरकारच्या डोळ्याच्या कढा बोलावल्यात असं या क्षणी तरी दिसत नाही. अहमदाबाद एअरपोर्ट हे केंद्र आहे. तिथे सहज कोणाला प्रवेश मिळतो ती कोण लोक आहेत? अहमदाबादला हा अपघात का झाला हे खूप प्रश्न लोकांच्या मनात आहेत," असंही राऊतांनी म्हटलंय.
"मेडिकल इमारती वरती विमान कोसळलं. आसपासचे लोक देखील मरण पावले हे सहज विसरता येणार नाही. पहलगाममध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याच पद्धतीचा हा अपघात आहे. यातून सरकार काय धडा घेणार आहे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
"हवाई क्षेत्रात सर्वात जास्त सतर्कता असलं पाहिजे. एअर इंडियाचा खाजगीकरण करून जबाबदाऱ्या झटकता येणार नाही. रतन टाटा यांच्या निधनाने टाटा समूहाला एअर इंडिया समूहाला गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे," असंही राऊत यांनी म्हटलं आहे. "विमानांची दुरुस्ती विमानांमध्ये सेवा या अनेक प्रश्नांवर चर्चा प्रश्नचिन्ह आहेत. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये घटनांपेक्षा व्यवहारांवर त्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षाने केली असेल तर ती योग्य आहे. या क्षेत्राने सुद्धा उद्योगपतींची स्पर्धा सुरू आहे. या क्षेत्रावर सत्ता मिळविण्याचा अजून घाणेरडा प्रयत्न सुरू आहेत त्याची प्रवाशांना भीती वाटत आहे," असं राऊत म्हणालेत.