Ashwini Bhide Post on Mumbai Metro: मुंबईला पावसाने तुफान झोपडल्यानंतर मान्सूनपूर्व कामांची पोलखोल झाली आहे. पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झालेला पाहायला मिळाला. पहिल्याच मुसळधार पावसात रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दुसरीकडे नुकतंच उद्घाटन झालेल्या पाणी वरळीतील मेट्रो स्थानकात पावसाचं पाणी घुसल्यानंतर फज्जा उडाला. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाच अक्षरश: चिखल झाला होता. यामुळे प्रशासनाचे दावे फोल ठरले. दरम्यान मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या संचालक व्यवस्थापक अश्विनी भिडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एक स्थानक ठप्प, पण मुंबईकरांचा मेट्रोला प्रतिसाद जबरदस्त असा दावा त्यांनी केला आहे.
अश्विनी भिडे यांनी एक्सवर पोस्ट शेअऱ करत मेट्रो सेवेवर पावसाचा फारसा परिणाम झाला नसून, दुपारपर्यंत 24 हजार प्रवाशांनी प्रवास पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. तसंच संततधार पावसामुळे एसडब्ल्यूडी नाल्यातून अचानक पाणी येऊन आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या निर्माणधीन प्रवेश द्वारातून स्थानकात आले असा दावा त्यांनी केला आहे.
अश्विनी भिडे यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे की, "मेट्रो सेवेवर पावसाचा फारसा परिणाम झाला नाही. आज दुपारपर्यंत 24 हजार प्रवाशांचा प्रवास पूर्ण झाला आहे. आरे ते वरळी मेट्रो मार्ग सुरळीत आहे. स्थानक बंद असतानाही 24 हजार प्रवासी सेवेवर खूश आहेत. एक स्थानक ठप्प होतं, पण मुंबईकरांचा मेट्रोला प्रतिसाद मिळाला".
"संततधार पावसामुळे एसडब्ल्यूडी नाल्यातून अचानक पाणी येऊन आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या निर्माणधीन प्रवेश द्वारातून स्थानकात आले. त्यामुळे स्थानक बंद ठेवावे लागले आहे," असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र उर्वरित वरळी- आरे मार्गावर सेवा सुरळीत चालू आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत सुमारे 24000 लोकांनी प्रवास केला अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान मुंबई मेट्रोने एक्सवर पोस्ट करत सांगितलं आहे की, "आचार्य अत्रे चौक स्टेशनवर गळतीमुळे झालेल्या व्यत्ययानंतर पुनर्संचयित करण्याचे काम सुरू आहे. सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी सर्व यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी आमचे अभियांत्रिकी आणि सुरक्षा पथक युद्धपातळीवर काम करत आहेत".
मेट्रो 3 ला अॅक्वालाईन का म्हटलं जात होतं हे आज कळलं. संरक्षक भिंतीचं काम सुरु होतं असं मेट्रोचं म्हणणे आहे मग उद्घाटनाची घाई का केली? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. खिशातले खड्डे भरले पण मुंबईतले खड्डे भरले नाहीत. स्वत:ला इन्फ्रामॅन म्हणवणारे आता कुठेयेत? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे.
मुंबईत मान्सूनची तयारी काय होती हे आता दिसत आहे. आता राजकारण बंद करा आणि मुंबईकरांकडे लक्ष द्या, असे मी शिंदेना सांगेन असे आदित्य ठाकरे म्हणाले. आपण होल्डिंग पंप बनवले होते. मेट्रो भिंत कशी पडू शकते? असा प्रश्न त्यांनी विचारला.