BDD chawls redevelopment: मुंबईत अतिशय झपाट्यानं असंख्य भागांमध्ये पुनर्विकासाच्या कामांना वेग आला असून, आता शहरातील बीडीडी चाळंचा पुनर्विकासही प्रगतीपथावर दिसत आहे. साधारण काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्त्वाची वस्ती असणाऱ्या या बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या नव्या घराचा ताबा यंदाच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मिळेल असं सांगण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र हा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.
ना. म. जोशी मार्ग इथं बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सातपैकी दोन इमारती डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येतील असं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी एका बैठकीत स्पष्ट केलं. या इमारतींचं काम पूर्णत्वास गेल्यानंतर पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना एप्रिल २०२६ पासून घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली जाईल. त्यामुळं वर्षभरानंतरच नव्या घरात पाऊल ठेवण्याची संधी बीबीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार आहे.
नुकतीच बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम कुठवर आलं यासंदर्भातील माहिती आणि प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्थळी एक बैठक पार पडली. जिथं इमारतींमध्ये 24 तास पाणीपुरवठा, गॅसची जोडणी, खिडक्यांना ग्रील आणि वरळीप्रमाणे स्वतंत्र पार्किंग, यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली.
सदर बैठकीसाठी म्हाडाचे अधिकारी, बांधकाम कंत्राटदार आणि स्थानिक रहिवाशांची उपस्थिती होती. एकिकडे रहिवासी पहिल्या टप्प्यातील घरांच्या प्रतीक्षेत असतानाच दुसऱ्या टप्प्यातील कामाविषयीचीसुद्धा माहिती जारी करण्यात आली. ज्यानुसार या टप्प्यात प्रत्यक्ष बांधकामाला मे महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे असून संक्रमण शिबिरं उपलब्ध नसल्यामुळे रहिवाशांनी घरभाडं घेत या प्रक्रियेत सहकार्य करावं असं आवाहन म्हाडानं केलं.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार असून, पहिल्या टप्प्यात 5198 रहिवाशांना हक्काच्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे. वरळीतील प्रकल्पासाठी तब्बल 22,901.25 कोटी इतका खर्च करण्यात येत असून, प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर तिथं रहिवाशांना संकुलाच्या परिघातच शाळा, रुग्णालयं, रिक्रिएशनल स्पेस अशा सर्व सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत.