Bhiwandi Sucide Case: आईला आपलं प्रत्येक बाळ प्रिय असतं. त्यांच्या भविष्यासाठी ती दिवसरात्र एक करते. पण नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत स्वत:सह आपल्या तिन्ही पोटच्या लेकींचं आयुष्यही संपवलंय. भिवंडी शहरातील कामतघर येथील फेणे पाडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 3 मुलींच्या आईने टोकाचं पाऊलं उचललंय. कुठे आणि कसा घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
कामतघर येथील फेणे पाडा येथे एका आईने आपल्या 3 मुलींसह गळफास घेतला. तिची पहिली मुलगी 12 वर्षांची, दुसरी 7 वर्षांची तर तिसरी मुलगी 4 वर्षांची होती. तीन मुलींसह 32 वर्षीय आईने घरातच छताला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
3 मे रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. संबंधित महिलेचा पती रात्रीची ड्युटी करून सकाळी घरी आल्यावर हा प्रकार समजला. त्याने घराचा दरवाजा बंद असल्याचं पाहिलं आणि खिडकीतून पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला घरात पत्नी आणि तीन मुली घराच्या छताच्या पाईपला गळफास लावून लटकलेल्या दिसल्या.
यानंतर पतीने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. भिवंडी शहर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. महिलेच्या पतीची चौकशी केली जात आहे. तसेच शेजारी, नातेवाईकांकडूनही माहिती घेतली जात आहे. संबंधित महिलेनं हे टोकाचं पाऊल का उचललं? यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपासत करत आहेत.