Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Budget 2025 आधी मुंबई- ठाण्यातील घरांसंदर्भात मोठी बातमी; सामान्यांच्या चिंतेत भर

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या मुद्द्यावर बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालंय. त्यातच ही महत्त्वाची बातमी लक्ष वेधून गेली.   

Budget 2025 आधी मुंबई- ठाण्यातील घरांसंदर्भात मोठी बातमी; सामान्यांच्या चिंतेत भर

Budget 2025 : संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सज्ज झालेल्या असतानाच त्याचा काही तास आधीच गृहनिर्माण क्षेत्रातील एक मोठी आणि लक्षवेधी बातमी समोर आली. मुंबई आणि ठाण्यातील घरांच्या दरांसंदर्भातील नवी आकडेवारी पाहता या दोन्ही शहरांमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसू शकतो. 

मायानगरी, अनेकांसाठी कर्मभूमी असणाऱ्या मुंबई शहराची व्याप्ती मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिथं ठाणे शहराचाही सर्वांगीण विकास झाला असून, अनेक खासगी संस्थांनी ठाण्यानजीकच व्यवसाय संकुलं उभारत रोजगारसंधी उपलब्ध करून दिल्या आहेत. परिणामी अतिशय वेगानं पुढे जाणाऱ्या या दोन्ही शहरांकडे अनेकांचा ओघ वाढताना दिसतोय. असं असलं तरीही या शहरात हक्काच्या घराचा शोध घेणं मात्र दिवसेंदिवस अधिकच कठिण होतना दिसत आहे. यामागे मुख्य कारण ठरतंय ते म्हणजे मुंबई आणि ठाण्यातील घरांचे वाढलेले दर. 

‘रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल अॅन्युअल राऊंडअप 2024’ या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2024 या वर्षात मुंबई महानगर क्षेत्रामध्ये घरांच्या किमतीत 18 टक्क्यांनी वाढ झाली. देशातील एकूण 8 शहरांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मालमत्ता दर मोठ्या फरकानं वाढल्याचं लक्षात आलं. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : उत्तरेकडे हिमवृष्टी, राज्यात मात्र पाऊस- गारपीटीची शक्यता; पुढील 24 तासांत नेमकं काय होणार? 

प्रामुख्यानं मुंबई, पुणे आणि चेन्नईमध्ये हे दर चढत्या आलेखामध्ये दिसून आले. जिथं दिल्ली (गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद) 49 टक्के, मुंबई महानगर क्षेत्र (मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे) 18 टक्के, पुणे, चेन्नई 16 टक्के आणि बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद इथं अनुक्रमे 12 आणि, 10-10 टक्के वाढ झाल्याचं स्पष्ट झालं. 

मागील दशकभराचा संदर्भ घेतल्यास स्वत:च्या घरासाठी सातत्यानं आर्थिक जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्यांसाठी मात्र आता आव्हानाचा काळ असणार आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

का वाढत आहेत घरांच्या किमती? 

मागील काही वर्षांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहे. याच कारणास्तव हक्काच्या घराच्या स्वप्नापासून सामान्य माणूस दूर लोटला जात आहे हेसुद्धा एक दाहक वास्तव. बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या साहित्यातील दरवाढ, मोठ्या घरांची वाढती मागणी, कामगारांची मजुरी यामुळं एकूणच घरांच्या किमतींमध्येही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. समाजातील अनेक मोठी नावं, बड्या व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी मुंबई, ठाण्याला पसंती दिल्यानं प्रामुख्यानं मुंबई शहर यामध्ये निवासी बाजारपेठेचं केंद्र असल्याचंही अहवालात सांगण्यात आलं आहे. 

येत्या काळात गृहनिर्माण क्षेत्रात फारसे बदल अपेक्षित नसून, घरांच्या किमती कमी होण्यासही वाव मिळताना दिसत नाहीय. त्यामुळं आता हक्काच्या घराचं गणित सामान्यांना घाम फोडणार हे खरं!

Read More