Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

... तर मास्क लावाच! डॉक्टरांचा मुंबईकरांना सल्ला; देशातील सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

Corona Update : कोरोना संसर्गानं पुन्हा डोकं वर काढले असून, देशभरात विविध राज्यांमध्ये सध्या कमीजास्त प्रमाणात हे रुग्ण आढळल्याचं वृत्त समोर आलं आहे.  

... तर मास्क लावाच! डॉक्टरांचा मुंबईकरांना सल्ला; देशातील सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

Corona Update : पाच वर्षांपूर्वी आरोग्य यंत्रणांना हादरवणाऱ्या कोरोना संसर्गानं पुन्हा डोकं वर काढलं असून हा संसर्ग सध्या भारतभर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5364 वर पोहोचली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 4724 रुग्णांना कोविडवरील उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. अतिशय झपाट्यानं वाढलेल्या या रुग्णसंख्येमुळं आता देशाच्या विविध राज्यातील आरोग्य विभागही सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

आतापर्यंत कोणत्या राज्यात किती रुग्ण? 

  • दिल्ली 562
  • गुजरात 615
  • कर्नाटक 415
  • केरळ 1679
  • महाराष्ट्र 548
  • राजस्थान 107
  • तामिळनाडू 221
  • उत्तर प्रदेश 205
  • पश्चिम बंगाल 596

कर्नाटक (1 मृत्यू) 65 वर्षीय पुरूष उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह मेलीटस (अपघाती कोविड-19 पॉझिटिव्ह स्थिती)

केरळ (2 मृत्यू) यामध्ये दोन्ही रुग्ण सहव्याधी असल्याचं लक्षात आलं. 
पंजाब (1 मृत्यू) 69 वर्षीय महिलेला फुफ्फुसांचा थ्रोम्बोइम्बोलिझम आणि लठ्ठपणाची व्याधी. 

सहव्याधी असल्यास लावा मास्क 

देशात कोरोनाचा संसर्ग डोकं वर काढत असतानाच मुंबईतही हीच स्थिती कायमच आहे. ज्यामुळं आरोग्यतज्ज्ञांकडून वृद्ध आणि आधीच सहव्याधी असलेल्यांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. या नागरिकांना घरात आणि उच्च जोखमीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 20 मे ते 3 जून दरम्यान एकूण रुग्णांमध्ये तिप्पट वाढ झाल्यानं यंत्रणा सतर्क आहे. राज्यातील एकूण संसर्गाच्या निम्म्याहून अधिक प्रकरणं मुंबईती असून राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, या 14 दिवसांच्या कालावधीत कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या 106 वरून 959 वर पोहोचली आहे.  पावसाळ्यामुळे श्वसन संसर्गात वाढ होत असून, कोरोना रुग्णवाढीस हे एक कारण असू शकतं असंही तज्ज्ञांचं मत आहे. 

कोरोनाच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून आरोग्य यंत्रणांचा आढावा

देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत असल्यामुळं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक आढावा बैठक घेतली. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, इमर्जन्सी मॅनेजमेंट रिस्पॉन्स सेल, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम आणि दिल्लीतील केंद्र सरकारच्या रुग्णालयांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आरोग्यसेवा महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडल्याचं सांगण्यात आलं. 

 

Read More