Explained Disha Salian Murder Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 2020 साली मुंबईत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाल्यानंतर 5 वर्षांनी सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून दिशाने आत्महत्या केली नसून तिचा बलात्कार करून हत्या झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणावरुन विधानसभेमध्ये आज चर्चा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दिशा सालियन प्रकरण नेमकं आहे काय? दिशाबरोबर नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊयात...
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सालियनच्या मृत्य सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच झाला होता. 28 वर्षीय दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूमध्ये केवळ पाच दिवसांचं अंतर होतं. 8 आणि 9 जून 2020 च्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिशाचा एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. या दोघांच्या मृत्यूचा संदर्भ अनेकांनी जोडला. दिशाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तिच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यात आला. तिच्या पोस्टमॉर्टमसाठी वेळ जाणूनबुजून लावण्यात आला का असा सवालही उपस्थित करण्यात आला.
डोक्यावर जखम झालेल्या आणि शरीरावरील अनेक जखमांमुळे दिशाचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं. दिशावर अत्याचार झाल्याचे कोणतेही पुरावे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सापडले की नाही यावरुन वेगवेगळे दावे करण्यात आले. दिशाच्या गुप्तांगावर कोणत्याही जखमा नसल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटल्याच्या बातम्याही समोर आल्या. त्यामुळे मृत्यूपूर्वी तिच्यावर छळ झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी फेटाळून लावलेल्याचंही सांगण्यात आलं. मात्र आता या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत.
8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी सुरु होती. या पार्टीत दिशाचा होणारा नवरा रोहन राय आणि जवळची मंडळी उपस्थित होती. थोड्याच वेळात अचानक या ठिकाणी आलेल्या हायप्रोफाईल व्यक्तींमुळं वातावरण बदलले, असा दावा करण्यात येत आहे. या हायप्रोफाईल व्यक्तींमध्ये तत्कालिनमंत्री आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांचा समावेश होता असं सांगितलं जात आहे. दिशा सालियनवर अमानुष सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीतून समोर आल्या आहेत. दिशाचं तोंड बंद करण्यासाठी तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
नारायण राणेंबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांनी अनेकदा या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचे आरोप केले आहेत. मात्र त्यांनी यासंदर्भात कधीच कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत. राणेंप्रमाणेच रामदास कदमांनीही आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणात होतं याचा उल्लेख केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मागील वर्षी नोव्हेंबर दापोलीमधील सभेत रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेत या प्रकरणावरुन गंभीर आरोप केले होते.
"दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेचे नाव होते. आमची सत्ता आल्यावर त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही," असं रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना इशारा देताना म्हटलं होतं. "आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता घराबाहेर जाऊन सकाळी पाच वाजता येतो. याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजेत," असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.