Politics on Pahalgam Terrorist Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 27 पर्यटकांपैकी 6 पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. डोंबिवलीमधील 3, पुण्यातील 2 आणि पनवेलमधील एका पर्यटकाने या हल्ल्यात प्राण गमावले आहेत. काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची घरी परत येण्यासाठी धडपड सुरु असतानाच सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असं असतानाच सध्या श्रीनगरमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे ठाणे मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या एका विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचं कौतुक करताना नेमकं असं काय म्हटलं आहे त्यामुळे वाद निर्माण झाला आहे पाहूयात...
पहलगाम हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटक ठार झाले. काश्मीरच्या विविध भागांत अडकलेल्या पर्यटकांना माघारी आणण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांना स्वत: मुख्यमंत्र्यानी तातडीने काश्मीरला पाठविले. असे असताना त्याच दिवशी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष विमानाने काश्मीरला गेले. यानंतर दोन्ही पक्षांकडून मदतीसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये 500 पर्यटकांना परत आणण्यात आल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे विशेष विमानांद्वारे एकूण 520 पर्यटकांना मुंबईत परत आणल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेनं केला आहे.
एकनाथ शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना खासदार म्हस्केंनी गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर काही आकडेवारी मांडली. "सरकार जबाबदारी समजून मदत करत आहे. घेऊन शिवसेनेतर्फे, एकनाथ शिंदेंतर्फे पाठवण्यात आलेलं विमान काल ज्येष्ठ नागरिक, महिलांचा समावेश असलेलं 75 पर्यटकांना घेऊन पोहोचलं. आता दुपारी 185 प्रवासी घेऊन एक विमान येणार आहे. रात्री सुद्धा 185 प्रवासी असलेलं विमान येणार आहे," असं म्हस्के पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.
पुढे बोलताना म्हस्केंनी, "तुम्हाला माहित आहे का? त्यामध्ये 45 प्रवासी असे आहेत जे वर्धा आणि नागपूरचे आहेत. ते रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. हे असे 45 लोक आहेत जे कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. तुम्हाला मिर्चा झोंबतात? काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान आणि आयएसआयचं नरेटीव्ह चालवण्याचं काम संजय राऊतांनी केलं," असं विधानही केलं. या विधानावरुनच आता म्हस्केंवर टीका केली जात आहे.
जे लोक कधीही विमानात बसले नाहीत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असे वक्तव्य करणाऱ्या महस्के यांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फटकारलं आहे. "विमानातून परत आणले म्हणजे काय लोकांवर उपकार केले का? असा संतप्त सवाल अंधारेनी विचारला आहे. सर्व स्तरातून म्हस्केंवर टीका होताना दिसत आहे. काळ, वेळ काय आहे आणि खासदार असणारी व्यक्ती कोणत्या गोष्टींवर बोलतेय याचं भान असायला हवं अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडूनही व्यक्त केली जात आहे.
दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयात महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी नरेश म्हस्केंच्या विधानाचा सामाचार घेतला आहे. "सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. मात्र खासदार नरेश म्हस्के यांच्या वक्तव्याचा निषेध केलाच पाहिजे. ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही," असं रोहिणी खडसे म्हणाल्या. "एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत. असे वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडतील हे विसरू नका," असा इशाराही रोहिणी खडसेंनी दिला. "लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा देत आहात, घरून पैसे भरले नाहीत," असा घणाघातही रोहिणी खडसेंनी केला.