ठाकरे बंधूंची युती झाल्यास याचा त्यांना किती फायदा होणार? यासंदर्भातला एक सर्व्हे समोर आलाय. दोन्ही बंधू एकत्र आल्यास आगामी पालिका निवडणुकीत 54 टक्के मतं ठाकरे बंधूंना मिळतील असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान या सर्व्हेचा दाखला देत भास्कर जाधवांनी भाजपवरही टीका केलीय.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रही बदलेल मात्र, दोन्ही भावांनी युतीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. दरम्यान दोन्ही बंधू एकत्र आल्यास आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या युतीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीत जवळपास 54 टक्के मतं ठाकरे बंधूंना मिळतील असा सर्व्हे समोर आलाय. या सर्व्हेचा दाखला देत भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात अपराजित आहे, मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचाच दबदबा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. मराठी माणसांसाठी ठाकरे कुटुंबानं जो संघर्ष केलाय त्याची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही असं म्हणत राऊतांनी मोदी-शाहांवर टीका केलीय.
तर तिकडे उदय सामंतांनी पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीसंदर्भात एक मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरेंच्या अटी राज ठाकरेंना मान्य नाहीत. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येणार नसल्याचं उदय सामंतांनी म्हटलय. तसंच देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलंय.
राज्यात पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे महायुती आणि मविआकडून मोटबांधणी सुरूय. त्यात राज ठाकरेंना मुंबईत सोबत घेण्यासाठी देखील पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे कुणासोबत निवडणुकीच्या मैदानात उतरणार याकडे आता सर्वांचच लक्ष लागलंय.