Jitendra Awhad On Dhananjay Munde Resignation : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आलेलं असतानाच इथं राजकीय वर्तुळात अनेक घडामोडीना वेग आला. कराडशी असणारी जवळीक अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना महागात पडली असं म्हणण्यात आलं. कारण ठरलं ते म्हणजे या घटनेनंतर मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेला राजीनामा. (Beed Santosh Deshmukh Murder Case)
वैद्यकिय कारणामुळं आपण राजीनामा दिल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलं असलं तरीही राजकीय वर्तुळात मात्र आता अनेक चर्चांना वाव मिळाला असून, त्यासंदर्भातच बुधवारी विधानभवनाबाहेर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी सूचक वक्तव्य केलं. मुंडेंच्या राजीनाम्यावरून आव्हाड म्हणाले, 'मला असं वाटतं, जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा त्या त्या पक्षाला काही वेगळे अधिकार मिळतात. तसे अधिकार तसे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा दिला त्या पक्षाची जबाबदारी होती म्हणून माझ्या अंदाजाने फडणवीसांनी नरमाईची भूमिका घेतली, हा तुमचा पक्ष आहे तुमचा निर्णय तुम्ही घ्या... अशी फडणवीसांची भूमिका असावी असा तर्क त्यांनी मांडला.'
'जेव्हा फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर येतोय तेव्हा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांना राजीनाम्यासंदर्भात समजवलं. मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेसचा असून, त्यांनी आधी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. यात मुख्यमंत्र्यांनी आधीच निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट होत आहे', हा मुद्दा आव्हाडांनी अधोरेखित केला.
दरम्यान बीडमधील या संपूर्ण प्रकरणात मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी आता जोर धरत असल्यासंदर्भातील प्रश्नाचं उत्तर देताना, 'ही सगळ्यांचीच मागणी असून, खंडणीपासूनच हे प्रकरण सुरू झालं होतं असं म्हणत सहआरोपी करा ही भाजपचीच मागणी आहे आणि या मागणीसाठी आमचं भाजपला समर्थन आहे', या शब्दांत आव्हाडांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
...तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला नसता
मुंडेंनी राजीनामा दिला त्याच दिवशीसुद्धा आव्हाडांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. "नागपूर अधिवेशनात या घटनेचं वर्णन मी जसंच्या तसं केलं होतं. या प्रकरणाची माहिती सरकारकडे 90 दिवसांपासून होती. महाराष्ट्रात पेटेल यामुळे मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे अन्यथा घेण्यात आला नसता," असं शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.