Mumbai Water Taxi Latest Updates: नवी मुंबई विमानतळ येत्या जुलै महिन्यात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा मार्ग सुकर होण्यासाठी वॉटर टॅक्सीचा पर्याय आखण्यात येत आहे. या वॉटर टॅक्सीमुळं दोन शहरातील अंतर 40 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील नागरिकांना नवी मुंबईत पोहोचणं सोप्प होणार आहे. याविषयीचा प्रस्ताव मत्स्य विभागाकडे असून यासाठी आवश्यक ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहे. यामुळे गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई अंतर 40 मिनिटांत पार करता येणार असून वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे.
पर्यटकांना वॉटर टॅक्सीचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर पर्यावरणपुरक प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
सरकारने नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडले जातील. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेट्रिक बोटींचा वापराामुळे प्रदूषण कमी होईल तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, असे राणे म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही वर्षापूर्वी एका खासगी कंपनीच्या मदतीने गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी वॉटर टॅक्सी सेवा सरू केली होती. 200 प्रवासी क्षमता असलेली ही वॉटर टॅक्सी अल्पप्रतिसादामुळं कालांतराने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा वॉटर टॅक्सीचा पर्याय समोर येत आहे.
मुंबईतून नवी मुंबई गाठायचं म्हटल्यास रस्ते मार्गे एक तासांचा वेळ लागतो. ऑफिसच्या वेळेत रस्ते मार्गाने अधिक वेळ लागतो. त्यामुळं नवी मुंबईकरांना प्रवासाचा हा आणखी एक पर्याय समोर येणार आहे. त्यामुळं प्रवासी आणि पर्यटक अवघ्या 40 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.