Aaditya Thackeray: मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्याचा थेट परिणाम रेल्वे लाईनसोबत मुंबई मेट्रो सेवेवरही झालायं. लोकल सेवा जवळपास 30 ते 40 मिनिटं उशिराने धावतेय. सायन ,घाटकोपर व कुर्ला या ठिकाणी पाणी साचत आहे त्यामुळे लोकल सेवा संथ गतीने असल्याने चाकरमान्यांचे हाल होतायत. तर वरळीच्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात चिखल साठलाय. या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केलीय.
मेट्रो 3 ला अॅक्वालाईन का म्हटलं जात होतं हे आज कळलं. संरक्षक भिंतीचं काम सुरु होतं असं मेट्रोचं म्हणणे आहे मग उद्घाटनाची घाई का केली? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. खिशातले खड्डे भरले पण मुंबईतले खड्डे भरले नाहीत. स्वत:ला इन्फ्रामॅन म्हणवणारे आता कुठेयेत? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी टीका केलीय.
मुंबईत मान्सूनची तयारी काय होती हे आता दिसतय. आता राजकारण बंद करा आणि मुंबईकरांकडे लक्ष द्या, असे मी शिंदेना सांगेन असे आदित्य ठाकरे म्हणाले. आपण होल्डिंग पंप बनवले होते. मेट्रो भिंत कशी पडू शकते? असा प्रश्न त्यांनी विचारला.
कितीतरी हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पण भाजप आणि शिंदे राजकारण करतंय. कामाकडे कोणाचेच लक्ष नाही. अंधेरी येथे 10 वर्ष भाजपाचे नगरसेवक, आमदार आहेत. टीका करणे सोपे असते. आम्ही नियोजन करायचो. पण आता तुम्ही काय यंत्रणा लावलीय? असा प्रश्न विचारत मुंबई पालिका ही मुख्यमंत्र्यालय कार्यालयातून चालते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मान्सून लवकर आल्याने तारांबळ उडाली.पालिका पूर्ण बरोबर आहे,असं म्हणणार नाही. पंप लावण्याचे काम सुरूय. सर्व पंप लावले जातील. नेहमीप्रमाणे मान्सूनची तयारी सुरू होती.पण पाऊस लवकर आल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टिकेलाही उत्तर दिले. हे तर मेट्रो बंद करायला निघालेत.पण आम्ही सुरू केली. आम्हाला राजकारण नाही तर काम करायचे आहे. नालेसफाई अजून सुरू आहे. 100 टक्के झालेली नसल्याचे शिंदे म्हणाले. वरळी मेट्रो स्टेशनात तात्पुरती बांधलेली भिंत पडल्याने आत पाणी गेले. मेट्रो सुरू केली नसती तर सुरु का केली नाही असे बोलले असते. मग उद्घाटनासाठी का थांबवता? दोन्ही बाजूनी बोलता का? एका बाजूने चाला असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या टीकेवर दिले.