सोशल मीडियावर BEST चा कंडक्टरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कंडक्टरने एका प्रवाशाच्या थेट कानशिलात लगावली आहे.
BEST च्या बसने प्रवास करताना कंडक्टरसोबत वाद झाल्याचा अनेकांचा अनुभव आहे. असाच एक अनुभव आणि वाद व्हिडीओत कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
या व्हिडीओत कंडक्टर एका प्रवाशावर चिडलेले दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या मार्गावर किंवा कोणत्या क्रमांवर आहे याबाबत कोणतीही माहिती सोशल मीडियावर पोस्ट केलेली नाही. 35 सेकंदाचा हा व्हिडीओ एका कंडक्टर आणि प्रवाशाचा वादाचा व्हिडीओ आहे.
एका बस प्रवासा ला मारण्यात आले आहे तर हे कृत्य बस कंडक्टर या व्यक्तीने केलेला आहे, ही परवानगी शासन देते का ? जर नसेल देत तर या इसम वर त्वरित कारवाई झाली पाहिजे,जेणे करून कुठल्याही प्रवासाला यापुढे त्रास होता कामा नये @CMOMaharashtra @mieknathshinde @NiteshNRane @MumbaiPolice pic.twitter.com/NlNp7XXpbY
— Amarjeet Pal (@Amarjee41233274) March 29, 2025
'पण का उतरायचंय' असं कंडक्टरला एक प्रवाशी वारंवार प्रश्न विचारतो. कंडक्टर काही उत्तर देत नाही तेव्हा तो कंडक्टरला हात लावून पुन्हा तोच प्रश्न विचारतो. त्यावर कंडक्टर इतका चिडतो की मागे वळून क्षणार्धात कसलाही विचार न करता तो त्या प्रवाशाच्या कानाखाली लगावतो आणि 'व्हिडिओ शूटिंग मत कर', असा धमकीवजा इशारा देतो आणि मोबाइलही खेचण्याचा प्रयत्न करतो. या प्रकारामुळे काही प्रवासी चिडतात. त्याचवेळी अन्य एक प्रवासी मध्यस्थी करत कंडक्टरला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि अन्य प्रवाशांना 'तुम्हाला काय करायचंय ते करा' असे सांगतो. त्यावर, तिकीट असूनही कंडक्टर उद्धट बोलत असल्याचा खुलासा दुसरा प्रवासी करतो, तेव्हाही कंडक्टर 'बडबड करु नकोस, शांत बस' असे ओरडतो आणि त्याला बोलू देत नाही.
आवश्यक कारवाईसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार नोंदवावी ही विनंती.
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) March 29, 2025
अमरजीत पाल यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर कंडक्टरवर त्वरीत कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच हा व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे आणि मुंबई पोलीस यांना टॅग केला आबे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्या पोस्टला उत्तर देत, 'संबंधित प्रवाशाने सर्वात जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी', असे सांगितले आहे.