Mumbai Local Train Accidents: देशाची आर्थिक राजधानी मुंबईची लाईफलाइन मानल्या जाणारी मुंबई लोकल ट्रेन प्राणघातक ठरतेय. 2014 ते 2025 दरम्यान उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे 30 हजार मृत्यू झाले आहेत. सरकारी रेल्वे पोलिस म्हणजेच जीआरपीच्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2014 ते मे 2025 पर्यंतच्या गेल्या 11 वर्षांत मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये 29 हजार 970 लोकांचा मृत्यू झालाय तर 30 हजार 214 लोक जखमी झाले आहेत.
मुंबईचे उपनगरीय रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात व्यस्त नेटवर्क मानले जाते. जिथे दररोज सुमारे 75 लाख प्रवासी प्रवास करतात.जीआरपीच्या आकडेवारीनुसार या 11 वर्षांत चालत्या ट्रेनमधून पडून 6 हजार 760 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर 14 हजार 257 प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे ट्रॅक ओलांडताना सर्वाधिक अपघात झालेयत. आणि या काळात 16 हजार 87 लोकांचा मृत्यू झालाय तर 3 हजार 369 लोक जखमी झाले आहेत.
रेल्वे खांबाला धडकल्याने 103 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 655 प्रवासी जखमी झाले. तर प्लॅटफॉर्म आणि ट्रॅकमधील अंतरात पडून 147 जणांचा मृत्यू झाला आणि 125 जण जखमी झाले. ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 181 जणांचा मृत्यू झाला आणि 203 जण जखमी झाले. त्याच वेळी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्यांच्या घटनांमध्ये 676 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 5 जण जखमी झाले.
जीआरपीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर दररोज सरासरी 7 जणांचा मृत्यू होतो. त्यापैकी किमान एक व्यक्ती चालत्या ट्रेनमधून पडून आपला जीव गमावते. यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत चालत्या ट्रेनमधून पडून किमान 120 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.
2024 मध्ये रेल्वे रुळांवर एकूण 2 हजार 468 लोकांचा मृत्यू झाला. जो 2023 मध्ये झालेल्या 2 हजार 590 आणि 2022 मध्ये झालेल्या 2 हजार 507 मृत्यूंपेक्षा थोडा कमी आहे. याशिवाय 2 हजार 697 लोक जखमी झाले. यापैकी सर्वाधिक मृत्यू मध्य रेल्वेवर 1 हजार 553 नोंदवले गेले आहेत तर पश्चिम रेल्वेवर 935 लोकांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये मृत्यूची मुख्य कारणे म्हणजे रुळ ओलांडताना 1 हजार 151 लोकांचा मृत्यू, चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 570 प्रवासी मृत्युमुखी पडले. तर ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात पडून 14 लोकांचा मृत्यू झाला. रेल्वेतून पडून कल्याण स्थानकात सर्वाधिक मृत्यू (116) झाले, त्यानंतर वसई स्थानकात 45 मृत्यू झाले.
गाड्यांमध्ये जास्त गर्दी असणे हे या अपघातांचे सर्वात मोठे कारण आहे. 12 डब्यांच्या लोकल ट्रेनची क्षमता सुमारे 1200 प्रवाशांची असते पण गर्दीच्या वेळी सरासरी 5 हजार 500 प्रवासी त्यात प्रवास करतात. याचा अर्थ असा की फक्त 100 लोकांसाठी जागा असलेल्या प्रत्येक डब्यात 450 प्रवासी बसतात, अशी माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली.