Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास गर्दीमुक्त व्हावा यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना आखण्यात येत आहेत. लवकरच मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकातील फलाट क्रमांक 5 व 2 ची लांबी वाढवण्यात येणार आहे. हे काम डिसेंबर 2025पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षात 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वाढ होणार आहे. त्यामुळं नागरिकांना गर्दीतून प्रवास करावा लागणार नाही. नागरिकांची गर्दी वाढत असल्याने सध्याच्या 12 डब्यांच्या लोकलमध्ये गर्दीचा ताण असह्य होतो. अशावेळी नागरिकांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. कधीकधी गर्दीमुळं अपघातदेखील होतात. यावर मार्ग काढण्यासाठी 15 डब्यांची लोकल चालवण्यात येणार आहे.
15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याची गरज आहे. 12 डब्यांच्या लोकलसाठी 270 मीटर लांबीचा फलाटाची गरज आहे. तर 15 डब्यांच्या लोकलसाठी 337 मीटर लांबीच्या फलाटाची गरज आहे. या लोकल चालवण्यासाठी मध्य रेल्वेने काही महत्त्वाच्या स्थानकांत प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली आहे. इतकंच नव्हे तर सिग्नल यंत्रणेतदेखील काही बदल केले आहेत. मात्र 15 डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी सर्व स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या लांबीत वाढ करण्याची गरज आहे.
मध्य रेल्वेवर सध्या 1,810 लोकल फेऱ्या धावतात. त्यातील 12 डब्यांच्या लोकल 131 असून 1788 फेऱ्या धावतात. तर 15 डबा लोकल 2 असून त्याच्या 22 फेऱ्या होतात. प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार सर्व लोकल 15 डब्यांच्या करण्यात याव्या अशी प्रवाशांची मागणी आहे.
मुंबईकरांचा लोकलच्या दरवाज्यात उभे राहात जीवघेणा प्रवास टळावा यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला कारशेडमध्ये साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजा असलेला एक डबा तयार केला आहे. त्यामुळे लटकंती टळणार असली तरी गर्दीच्या वेळी हवा खेळती राहण्यासाठी, वायूविजन, विशेष अशी कोणतीही व्यवस्था या डब्यात नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे साध्या लोकलमध्ये लटकंती बंद होणार असली तरी वायूविजनचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.